बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत सामान्य माणसाला भोगावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार न घडतील याची काळजी घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.