नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या उभय सदनात उमटले. लोकसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन गदारोळ केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'सोनिया गांधी महामानव नाहीत' असा टोला मारला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. दरम्यान सोनिया यांच्या ईडी चौकशीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन करुन सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी करण्यात आल्याच्या मुद्यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारकडून बदला घेण्याचे राजकारण सुरु असून अशा कारवायांना घाबरणार नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावर बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, कायद्यासमोर सर्वजण सारखे आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा महामानव आहेत का? कॉंग्रेसवाल्यांना वाटते की आम्ही कायद्याच्या वर आहोत. मात्र कायदा आपले काम करेल, असा निर्वाळा आपण सरकारच्या वतीने देतो. जोशी यांच्या उत्तरानंतर गदारोळ झाला आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज तहकूब करावे लागले.
दरम्यान, कॉंग्रेससहित द्रमुक, माकप, भाकप, आययुएमएल, नॅशनल कॉन्फरन्स, टीआरएस, एमडीएमके, व्हीसीके, शिवसेना, राजद, आरएसपी आदी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करीत सरकारच्या कारवाईला विरोध केला आहे. केंद्रातले मोदी सरकार विरोधी नेत्यांचा बदला घेत असून तपास संस्थांना सर्रास गैरवापर केला जात आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या विरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल. नेत्यांच्या उत्पीडनाची आम्ही निंदा करीत असून या सरकारने सामाजिक सौदाहार्य बिघडवण्याचे काम थांबवावे, असे निवेदनात म्हटले आहे.