नाशिक : मेथी, कोथिंबीरला १ रुपया भाव ; शेतकऱ्यांचे नागरिकांना ‘फुकट लेके जाओ’

नाशिक : मेथी, कोथिंबीरला १ रुपया भाव ; शेतकऱ्यांचे नागरिकांना ‘फुकट लेके जाओ’
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर आणि मेथीला शेकड्याला अवघा १०० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी नाका येथे नागरिकांना अक्षरश: फुकट जुड्यांचे वाटप केले. यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती, तर दुसरीकडे वाहतुकीची कोंडी झाली होती.

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. यानंतर सरकारला जाग आली व त्यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदीचा निर्णय घेतला. हाच प्रश्न विधानसभेतही गाजत आहे. नाशकात शिष्टमंडळाने भेट देऊन कांदा भावाबाबत कोणत्या त्रुटी आहेत, याचा अभ्यास केला. मात्र, अजूनही कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत नसतानाच दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावामध्ये पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात मेथी व कोथिंबीर या पालेभाज्यांना प्रतिशेकडा शंभर रुपयांचा भाव मिळाला. म्हणजेच प्रतिजुडी एक रुपया भाव मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी लिलावातून भाजी काढून तिचे दिंडोरी नाका परिसरात नागरिकांना फुकट वाटप केले.

२५ हजारांचा खर्च

याबाबत शेतकरी संतोष बाबूराव बरकडे, (रा.जोपूळ, ता. दिंडोरी) व भूषण सुभाष आथरे, (रा. अंबरखेड, निफाड) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित पिकासाठी २५ हजार रुपये खर्च आलेला असताना लिलावात मात्र त्याचे शेकडा अवघे शंभर रुपये हाती येत आहेत. पीक लावणे, औषधफवारणी करणे, पाणी भरणे, माल काढणे, लिलावामध्ये भाजीपाला घेऊन येणे, हमाली हा सर्व खर्च जोडल्यास पंचवीस हजार रुपये त्यांना खर्च येतो. मात्र, भाव मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

१० रुपये भावाची अपेक्षा

कमीत कमी १० रुपये प्रतिजुडी भाव अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र एक रुपया प्रतिजुडी भाव मिळत आहे. किरकोळ विक्रेते यास पालेभाज्यांची दहा ते पंधरा रुपयांना विक्री करत आहेत. बाजार समितीत पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

पालेभाज्यांना हमीभाव कसा मिळणार ?

कांद्यासारख्या काही दिवस टिकणाऱ्या पिकास केंद्रशासन व राज्यशासन नाफेडमार्फत खरेदी करून काही प्रमाणात हमीभाव देऊ शकते. मात्र पालेभाज्यांबाबत अशी कुठलीही तजवीज कुणालाही करता येत नाही अथवा त्याची साठवणूक करता येत नाही अथवा त्याच्या विक्रीसाठी थांबता येत नाही. ही शोकांतिका आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news