पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच सिंधुदुर्गाचा विकास केला. बाळासाहेबांच्या आशीवार्दामुळेच मी मुख्यमंत्री झालो. या सिंधुदुर्गच्या विकासासाठी १२० कोटी रुपये दिले. पिण्याच्या पाणासाठी ११८ कोटी रुपये मंजूर केले. आज सिंधुदुर्गाच्या मुलभूत विकास केवळ नारायण राणे मुळेच झाला आहे. नेमका कोणी विकास केला, हे जनतेला माहिती आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा Chipi Airport लोकार्पण सोहळ्यात ते बाेलत हाेते.
काही दिवसांपूर्वीच राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष राज्याने अनुभवला. याची धग कायम असतानाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक व्यासपीठावर आले. यावेळी राणे काय बोलतात सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करत राणे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, आज माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. कोणतीही राजकारण करु नये, असे मला वाटत होते. मी येथे आलेलो होतो. विमानतळ पाहिले फार बरं वाटलं. व्यासपीठावर मुख्यमंत्री आले. माझ्याशी बोलले, असेही राणे म्हणाले.
माझा जन्म सिंधुदुर्गच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. येथे १९९०मध्ये मी प्रथम विधानसभेवर निवडून आलाे. जिल्ह्यातील अडचणी व समस्या जाणून घेतल्या. पाच हजार मिलीमीटर पाउस पडतो मात्र पिण्यास पाणी नव्हते. या जिल्ह्यात रस्ते नव्हते. अनेक गावांत वीज नव्हती. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नव्हती. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या आशीवार्दामुळेच मी मुख्यमंत्री झालो. या सिंधुदुर्गच्या विकासासाठी १२० कोटी रुपये दिले. पिण्याच्या पाण्यासाठी ११८ कोटी रुपये मंजूर केले. आज सिंधुदुर्गाच्या मुलभूत विकास केवळ नारायण राणेमुळेच झाला आहे. मी जिल्ह्याचा विकास केला. जनतेला माहिती आहे नेमका विकास कोणी केला, असेही त्यांनी नमूद केला.
१५ ऑगस्ट २००९ विमानतळ उभारणीचा पायाभरणीला विरोध झाला होता, अशी आठवण सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोटोही दाखवला. यावेळी कोणी अडवून केली याची विचारणा करा. टाटा संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालाचा अभ्यास राज्याच्या पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विमानतळ झाले आहे. आता विमानतळाबाहेरील रस्ते करा, असे आवाहनही राणे यांनी केली. बाळासाहेबांना खोटे बोलणारे कधीच आवडले नाही. तुमचे लोकप्रनिधी काय करत आहेत, याची वस्तुनिष्ठ माहिती घ्या. आदित्य ठाकरे कर्तबगार मंत्री तुम्ही कामगिरी करुन दाखवा, असे आवाहनही त्यांनी केला.
शिवरायाचे केवळ नाव घेवू नका सिंधुदुर्ग किल्ल्याची डागडुजी करा. ८० टक्के उद्योग माझ्याकडे आहेत. या राज्याच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. समुद्र किनारी कोणते उद्योग करता येतील याची पाहणी आहे. एमआयडीसीचे सहकार्य करणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विकास हाच माझा मानस आहे. मला कितीही कोणीतही अडचण निर्माण केल्या तरी मी विकासकामे करणारच, असेही त्यांनी सांगितले.