पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्रसरकारने या संघटनेला बेकायदेशीर घोषित केले असून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. दरम्यान या कारवाईनंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पीएफआयप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली पाहिजे. पीएफआय आणि आरएसएस या दोन्हीही संघटनांचा योग्यरित्या तपास व्हायला हवा, असे लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. (Laluprasad Yadav On RSS)
लालूप्रसाद यादव म्हणाले की, देशातील जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. देशात हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद लावून कट्टरतेला खतपाणी घातले जात आहे, असे सरकार जास्त काळ सत्तेत रहायला नको. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. आता पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रीय होत आहेत. (Laluprasad Yadav On RSS)
दरम्यान पीआयएफवर बंदीच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते सुरेश यांनीही प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे. पीएफआयवर बंदी घालणे पुरेसे नाही. त्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली पाहिजे. ही संघटनाही धार्मिक तेढ पसरवण्याचे काम करत असते, असे काँग्रेस नेते सुरेश यावेळी बोलताना म्हणाले. (Laluprasad Yadav On RSS)
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपशी युती तोडून राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करत सत्तास्थापन केली. यानंतर नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी वारंवार भाजपवर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांच्याबरोबरचं राष्ट्रीय जनता दलाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत आहेत.