कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे, याबाबत निकालाच्या प्रति रविवारी रात्री १२ वाजता संबंधितांना देण्यात आल्या.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांनी कारखान्याच्या कराराचा भंग केल्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २९ मार्च रोजी त्यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात संबंधितांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे दि. ३१ मार्च रोजी अपील दाखल केले होते. यावर मंगळवार दि. ४ व गुरुवार दि. ६ रोजी सुनावणी पूर्ण झाली. अपील दाखल झाल्या तारखेपासून दहा दिवसात यावर निर्णय देणे बंधनकारक होते, याचे पालन करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी रविवार दि. ९ रोजी रात्री १२ वा. संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोच केल्या.
निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असणार आहे. बुधवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून गुरुवार दि. १३ रोजी चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. निर्णय विरोधात गेल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने यावर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.
हेही वाचा :