कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरातल्या वरणगे पाडळी येथील एका शाळेतील शिपायाचा मुंबईत मृत्यू झाला. मात्र वरणगे पाडळी येथे वेगळ्याच व्यक्तीचा मृतदेह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरणगे पाडळी या गावातील कृष्णात पाटील हा तेथील ज्योतिर्लिंग विद्यालयामध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून काम करत होता. काही दिवसापूर्वी त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने मुंबई मधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांचे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह गावी घेऊन आल्यानंतर हा वेगळ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीला अग्नी देताना चेहरा उघडण्यात आला होता तेंव्हा हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृतदेह अजूनही संबंधित रुग्णालयातच असल्याची माहिती मिळाली असून तो कोल्हापूरला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.