पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद ( Javed Miandad ) याने पुन्हा एकदा भारताविरोधात कांगावा केला आहे. जोपर्यंत बीसीसीआय आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवत नाही तोपर्यंत पाकिस्तानने सामने खेळण्यासाठी शेजारच्या देशात दौरा करू नये. पाकिस्तानने वन-डे विश्वचषकावर बहिष्कार घालावा, असे आवाहनही त्याने केले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे. यानंतर मियांदादने थेट वन-डे विश्वचषकावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत स्वत:ला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.
आशिया चषक पाकिस्तानात होणार असला तरी भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. हा निर्णय मियांदादच्या पचनी पडलेला नाही. आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात येणार नाही हे निश्चित दिसत होते, त्यामुळे आता आम्ही कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे, असेही आवाहन त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला केले आहे.
जावेद मियांदाद म्हणाला की, "पाकिस्तानने २०१२ आणि २०१६ मध्येही भारताचा दौरा केला होता. आता भारताने
पाकिस्तानमध्ये येवून क्रिकेट खेळण्याची वेळ आली आहे. जर मी निर्णय प्रक्रियेत असतो तर भारतात सामना खेळायला गेलो नसतो. भारताविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही नेहमीच तयार होतो; पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही."
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान क्रिकेटचा एक दर्जा आहे. आम्ही क्रिकेटला दर्जेदार खेळाडू देत आहोत. आम्ही भारताचा दौरा रद्द केल्यास आम्हाला काहीच फरक पडणार नाही. भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणावामुळे द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. मी नेहमीच म्हणत आलो की क्रिकेट हा खेळ लोकांना एकमेकांच्या जवळ आणतो. तो देशांमधील गैरसमज संपवू शकतो. खेळ आणि राजकारण एकमेकांपासून लांब ठेवले पाहिजे, असेही मत त्याने व्यक्त केले.
हेही वाचा :