पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. १९) सुरु झालं आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन चर्चेत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. आज विरोधी पक्षातील नेत्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरुन सभात्याग करत निषेध व्यक्त केला आहे. "रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार बदलताच क्लोजर रिपोर्ट कसा काय? असे प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला अजित पवार यांनी धारेवर धरले.
आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (नागपूर) चौथा दिवस. चौथ्या दिवशीही विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी बाकावरुन सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधी पक्षातील नेत्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर श्रीखंड डबे हातात घेऊन आंदोलन केले. त्याचवेळी सत्ताधीरी पक्षातील नेत्यांनीही भजन म्हणत मविआच्या सरकारला प्रत्यूत्तर दिले. त्यानंतर सत्र सुरु असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भास्करराव जाधव यांनी रश्मी शुक्ला प्रकरणी चर्चा करावी, अशी मागणी केली. पण सभाअध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यांनतर विरोधकांनी सभात्याग केला.
रश्मी शुक्ला यांनी विरोधकांचे फोन टॅपिंग केले. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. सरकार आल्यावर ते रद्द करण्यात आले या विरोधात विरोधक विधान सभेत आक्रमक झाले. हे कारण सांगत विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर प्रश्न उपस्थित करत धारेवर धरलं. रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या आदेशावरून फोन टॅप केले, हे समोर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना पाठीशी घातले जात आहे. सरकार दुजाभाव करत आहे. सरकार बदलताच क्लोजर रिपोर्ट कसा काय? असा आरोप केला आहे. प्रश्नोत्तराऐवजी रश्मी शुक्ला प्रकरणावर चर्चा करण्याची मागणीही यावेळी केली.
हेही वाचा