नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेल्या उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाकाळात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोना काळात वर्ष २०२०-२१ मध्ये १२७ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेत धक्कादायक म्हणजे या काळात ५ वर्षांच्या खालील २६ अशा मिळून एकूण १५३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Infant Mortality In Nagapur)
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आरोग्य यंत्रणेतील उणिवा प्रकर्षाने पुढे आल्या होत्या. अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध झाले नव्हते. तर कुणाला वेळेवर ऑक्सिजन मिळू शकले नाहीत, कुणाला रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाले नव्हते. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या या बालमृत्यूंपैकी सर्वाधिक १२१ मृत्यू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदविले गेले आहेत. या काळात नागपूर महापालिकेच्या हद्दीतील ६ बालकांच्या मृत्यूचीही नोंद घेण्यात आली आहे. (Infant Mortality In Nagapur)
चिंतेची बाब म्हणजे कोरोना काळात ५ वर्षांच्या खालील २६ अशा एकूण १५३ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांपैकी कोरोना काळात जीव गमावलेल्या बालकांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यापासून ते विभागीय स्तरावरील सर्व व्यवस्था कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात गुंतली होती. याच संक्रमण काळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच वर्षांच्या खालील २६ बालकांचे अकाली मृत्यू ओढवले.
त्यापूर्वीचा मागोवा घेतला असता, नागपूर शहर व ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण १३२ तर २०१९-२० मध्ये पाच वर्षांच्या खालील १२५ बालके दगावली. २०२१-२२ मध्ये देखील १०६ बालके अकाली दगावल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने घेतलेल्या नोंदीवरूनच समोर आली आहे. त्यामुळेच आता केवळ मेळघाटातच नव्हे तर नागपूर विभागातही बालमृत्यू संदर्भात वेळीच आवश्यक उपायांवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा :