नांदेड ; पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 36 मंडळात अतिवृष्टी झाली असून, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रस्ते, शेतजमिनी आणि पाझर तलावांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली धर्माबाद या चार तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जनावरे मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देगलूर, मुखेड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पहाणी केली. गावकरी व शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासन अहोरात्र सोबत असल्याचा विश्वास त्यांनी ग्रामस्थाना दिला.
मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीमुळे फुटला. पाण्याचा विसर्ग हा संथ गतीने राहिल्यामुळे पाणी एकदम बाहेर निघाले नाही. मौजे येसगी तालुका बिलोली येथील मांजरा नदीला पूर आला असून, पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी व प्रशासन टीम प्रत्यक्ष जागेवर हजर आहेत. नांदेड- हैदराबाद वाहतूक सद्या ठप्प आहे. सुगाव, सावरगाव आणि मनसक्करगा या गावांना जोडणारा रस्ता वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड-यवतमाळ सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्याला पाणी आले असून, नागरिकांनी या परिसरात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा :