पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिष कनेरिया याने पाकचा माजी कर्णधार आणि इतर खेळाडूंवर खळबळजनक आरोप केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पाकिस्तानमध्ये हिंदूंना किती संघर्ष करावा लागतो? याबाबत भाष्य केले आहे. शाहिद आफ्रिदीने माझ्यावर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला. त्याचा माझा करियरवर मोठा परिणाम झाला, असे दानिष कनेरिया म्हणाला आहे.
दानिष पुढे बोलताना म्हणाला, "भारतातही खेळाडू पूजा करतात, विराट कोहली-रोहित शर्माही पूजा करतात. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजही नमाज अदा करू शकतात, पण ते कधीही मैदानावर कधीही नमाज अदा करताना दिसले नाहीत. पाकिस्तानमध्ये जे काही सुरु आहे, त्याच्या विरोधात मी आवाज उठवीन. मी सनातनी आहे आणि हिंदू समाजासाठी आवाज उठवणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रसारमाध्यमांनी यावर आवाज उठवावा अशी माझी इच्छा आहे."
"देवाच्या कृपेने माझे करिअर चांगले चालले होते. इंझमाम उल-हक आणि शोएब अख्तर यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. मात्र, शाहिद आफ्रिदीने मला खूप त्रास दिला. त्याने माझ्यासोबत जेवण केले नाही. इतकेच नाही तर त्यांनी धर्म बदलण्याबाबतही बोलले. माझा धर्मच माझ्यासाठी सर्वस्व आहे." असेही दानिष यावेळी बोलताना म्हणाला.
दानिष कनेरिया पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी २००० ते २०१० या दरम्यान खेळला. लेग स्पिनर असलेला दानिष कनेरिया वसीम आक्रमनंतर दुसरा सर्वात जास्त विकेट्स पटकावणारा गोलंदाज ठरला होता. दानिष कनेरिया हा हिंदू आहे. त्याचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला. कनेरियाने पाकिस्तानकडून ६० पेक्षा जास्त कसोटी सामने आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत.