मुंबई : पुढारी ऑमलाईन डेस्क : शिवसैनिकांमुळे शिवसेना उभी राहिलीय. शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी संघर्ष केलाय. आता शिवसैनिक दूर गेलेत म्हणून वेगवेगळ्या यात्रा केल्या जाताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली म्हणून सांगितलं जातंय. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तेव्हा शिंदेंनी बंड केलं का? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केसरकर म्हणाले, वेगवेगळ्या नावाने यात्रा काढल्य जाताहेत. संघटनेसाठी भूमरे वर्षभर जेलमध्ये राहिले. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तरी शिंदे शांत राहिले, त्यांनी बंडखोरी केली नाही. ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद देऊ केलं त्यावेळी शिंदेंच्या डोळ्यात अश्रू वाहिले. शिवसैनिकांमुळे शिवसेना ताठ मानेने उभी राहिली. कट्टर शिवसैनिकांची बदनामी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
केसरकर म्हणाले, आमच्यावर आरोप केले जाताहेत. मुख्यमंत्री तुम्हीच राहा पण आघाडीतून बाहेर पडा, असं शिंदेंनी सांगितलं होतं. हिंदुत्वासाठी आमदारकी पणाला लावली गेली. आम्ही हाडाचे शिवसैनिक, अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न कशासाठी? बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडणार असाल तर शिवसेना कशी? आम्ही दोन तृतीयांश, आम्ही अपात्र ठरू शकत नाही. शिंदेंनी लढा दिला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिले.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर केसरकर म्हणाले-आम्ही आदराने बोलतो, तुम्हा आदराने बोला. शिवसैनिकांचा अपमान करू नका.
शिवसैनिक दूर गेले म्हणून आता यात्रा सुरू केल्या. सेनेचे केवळ ५५ आमदार का निवडून आले? आमदारांच्या कामामुळे जनेतेने निवडून दिले. शिवसेनेचे सर्व आमदार निवडून का आले नाहीत, असा सवालही केसरकर यांनी केला. आम्हाला डिवचलात तर महागात पडेल, अशा शब्दात केसरकरांनी बल्लाबोल चढविला. शिवसेना वाचवण्यासाठीच आमचा लढा आहे. निवडणुकीच्या धमक्या देऊ नयेत. आमची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आहे, असेही केसरकरांनी नमूद केलं.
आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे तरुण नेते आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले.