माजलगाव; प्रतिनिधी
सुमारे एक वर्षांपूर्वी खाजगी कर्जाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली होती. यानंतर मुलानेही कर्ज परतफेडीसाठीच्या तगद्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान राजेवाडी येथील राहत्या घरी घडली.
माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकरी बाबुराव महागोविंद यांनी एक वर्षापूर्वी खासगी पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांचे वर्ष श्राद्ध होते. वर्षश्राद्ध झाल्यापासून मागील दोन दिवसांपासून मुलगा ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद हा अतिशय तणावाखाली होता.
याच तणावात आणि बँकेकडून होत असलेल्या छळास कंटाळून शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर यांनी राहत्या घरीच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. वर्षभरातच एका शेतकरी कुटुंबाने घरातील दोन कर्ते पुरुष गमावल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, गावात देखील हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
दरम्यान माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ज्ञानेश्वर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची दिंद्रुड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.