पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा ४ सप्टेंबर रोजी पालघरजवळील चारोटी पुलावर कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क वर्तविले जात असताना मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी लक्झरी कार निर्माता मर्सिडीज कंपनीने गुरुवारी पालघर पोलिसांना तपास अहवाल सादर केला.
कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) ज्या कारमध्ये बसले होते. ती कार अपघाताच्या अवघ्या पाच सेकंद आधी १०० किमी प्रतितास वेगाने प्रवास करत होती. ब्रेक लावल्यानंतर कारचा वेग ८९ किमी प्रतितास इतका कमी झाला, तोपर्यंत कारची धडक झाली होती. १०० किमी प्रतितास वेगाने कार चालवताना अनाहिता या चालकाने ब्रेक लावले होते का, अशी विचारणा पोलिसांनी कंपनीला केली आणि कारला किती वेळा ब्रेक लावला हेही विचारले आहे.
मर्सिडीज कंपनी १२ सप्टेंबर रोजी कार आपल्या शोरूममध्ये घेऊन जाणार आहे. त्यानंतर या घटनेबाबत अधिक तपशील गोळा करेल. हाँगकाँगचे एक पथक कारची तपासणी करण्यासाठी येईल आणि त्यानंतर सविस्तर अहवाल सादर करेल. हाँगकाँगच्या टीमने व्हिसासाठी अर्ज केला असून पुढील ४८ तासांत टीम न आल्यास भारतातील एक पथक वाहनाची तपासणी करून सविस्तर अहवाल देईल.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपल्या अहवालात म्हटले आहे की, अपघात झाला तेव्हा वाहनातील एकूण ४ एअरबॅग उघड्या होत्या. ४ एअरबॅग फक्त पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी होत्या. घटनेदरम्यान उघडलेल्या चार एअरबॅगपैकी एक एअरबॅग ड्रायव्हरच्या डोक्यासमोर, ड्रायव्हरच्या गुडघ्यावर आणि ड्रायव्हरच्या डोक्याच्या वर उघडी होती. त्याचवेळी चालकाच्या शेजारील सीटची एअरबॅगही उघडली होती.
दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्यासह तिघे जण मर्सिडीज बेंच कारमधून प्रवास करत होते. अनाहिता पांडोळे गाडी चालवत होत्या. अचानक कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. अपघातावेळी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे कारच्या मागील सीटवर बसले होते. या अपघातात अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे यांचा जीव वाचला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मिस्त्री आणि दारियस यांचा भाऊ जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का ?