नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेच्या पात्रतेत मोठा बदल करण्यात आला असून, यापुढे आयकराचा भरणा करणार्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून हा बदल अंमलात येईल. आयकर कायदा 1961 नुसार जी व्यक्ती आयकराचे देणे लागते, ती व्यक्ती करदाता मानली जाईल, अशा व्यक्तीला अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवीन आदेश लागू होण्यापूर्वी नागरिक योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. अटल पेन्शन योजनेसाठीची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे इतकी आहे. ४ जून रोजीच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच अटल पेन्शन योजनेचा फायदा घेणार्या लोकांची संख्या 5 कोटी 33 लाख इतकी आहे. योजनेच्या धारकांची सुमारे 7 लाख 39 हजार 393 कोटी रुपये इतकी रक्कम संबंधित प्रबंधन संस्थांकडे जमा असल्याचे पेन्शन नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी सांगितले.
एकट्या अटल पेन्शन योजनेशी 3.7 कोटी लोक जोडले गेलेले आहेत. अटल पेन्शन योजनेच्या लाभधारकांना वयाच्या साठीनंतर त्यांच्या जमा रकमेनुसार मासिक 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये इतके पेन्शन मिळते. लाभधारकाचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला योजनेचा लाभ दिला जातो.
हेही वाचा :