पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलत असतात तेव्हा भाजप आमदार टाळ्या वाजवत नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही घोषणा केली की, बाके वाजवली जातात. सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असतात तर उपमुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना लगावला.
या वेळी अजित पवार म्हणाले की, लवकर योजना लागू होईल, प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव दिल्लीतून मंजूर झालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मी हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी या वेळी एकनाथ शिंदे यांना केले. सरकारमधील मंत्र्यांकडूनच महापुरूषांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
विधानसभेत बोलत असताना समृद्धी मार्गाबाबतच्या प्रश्नही अजित पवार यांनी मांडले. समृद्धी मार्गावर पेट्रोल पंप नाहीत, एकही चार्जिंग स्टेशन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंत्रीमंडळात महिलांना स्थान द्या. शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत व्यापक धोरण राबवा, असे आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.