नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : गव्हाची निर्यात बंद केल्यानंतर केंद्र सरकार आता तांदळाची निर्यातही बंद करण्याचा विचार करत आहे. भाताचे उत्पादन घेणाऱ्या देशातील ३ राज्यांत पाऊस कमी अथवा अनियमित झाला आहे, तसेच काही ठिकाणी भात पिकांवर कीड पडलेली आहे, त्यामुळे तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकार तांदूळ निर्यातीवर ( Rice export ) निर्बंध लावण्याचा विचार करत आहे. या संदर्भातील वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.
तांदळाचा पुरवठा या दोन कारणांनी कमी होत आहे, तर दुसरीकडे महगाईही वाढत आहे. त्यामुळे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. जर असा निर्णय झाला तर भारतातील शेतकरी तसेच भारताकडून तांदूळ घेणारे देश यांना मोठा फटका बसू शकतो.
भारताकडे २८ दशलक्ष टन इतका तांदूळ साठा आहे, सर्वसाधारण हा साठा ११ दशलक्ष टन इतका असणे आवश्यक आहे. शेतीविषयक अर्थशास्त्राचे अभ्यासक अशोक गुलाटी आणि रितिका जुनेजा यांनी भारतातील महागाई भाजीपाल्याचे दर आणि इंधनाचे दर यामुळे वाढत असल्याचे म्हटले आहे. कंझ्यमुर प्राईस इंडेक्समध्ये २ टक्के इतका वाटा तांदळाच्या दराचा आहे. सरकराने असा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका देशातील शेतकरी आणि इतर विकसनशील राष्ट्रांना बसेल, असे या बातमीत म्हटले आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भाग या भागांत भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागात पाऊस अनियमित असून येथे भाताचे उत्पादन घटले आहे.