Amravati violence : संचारबंदी कायम, 14 हजार 673 जणांविरुद्ध गुन्हे  | पुढारी

Amravati violence : संचारबंदी कायम, 14 हजार 673 जणांविरुद्ध गुन्हे 

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये (Amravati violence) शहरातील विविध पोलीस ठाण्यात दोन्ही समुदयाविरुध्द तब्बल 26 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामध्ये 14 हजार 673 नागरिकांविरुध्द दंगलीचे गुन्हे नोंदविले आहे. शहर पोलिसांनी शनिवारी व रविवारी या दोन दिवसात शंभरावरून अधिक नागरिकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले होते. आता पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध धरपकड मोहिमेला गती दिली आहे. आरोपींचे अटकसत्र सुरुच आहे. शहरातील संचारबंदीमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. रस्त्यावर केवळ अतिआवश्यक कामानिमित्त निघणारे नागरिक दिसत आहे. चौकाचौकात पोलिसांचा तगडा पहारा कायम आहे.

12 नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी मालमत्तेचे नुकसान केल्याने 11 गुन्हे नोंदवून, त्यामध्ये 8 हजार 364 नागरिकांना आरोपी बनविले आहे. याच दिवशी नऊ जणांना अटक देखील केली. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या जाळपोळ व तोडफोडीमध्ये पोलिसांनी 15 गुन्हे नोंदविले असून, यामध्ये 6 हजार 309 आरोपी बनविले आहे. त्यांच्याकडून शस्त्र व लाठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

भाजपाच्या शेकडो नेत्यांना अटक

दंगलीच्या (Amravati violence) अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये कोतवाली पोलिसांनी रविवारपर्यंत सुमारे 25 जणांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी भाजपा पदाधिकार्यांच्या अटकेसाठी त्यांचे घर व फार्म हाऊसला जाऊन पाहणी केली. सोमवारी सकाळीच पोलिसांनी भाजपाचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना प्रथम अटक केली. त्यानंतर भाजपाचे महापौर चेतन गांवडे, नगरसेवक तुषार भारतीय, शिवराय कुळकुर्णी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, अजय सामदेकर, निवेदता चौधरी, सुरेखा लुंगारे, राधा कुरील यांना अटक करण्यात आली. पोलीस आमदार प्रविण पोटे यांच्या अटकेसाठी पहाटेच त्यांच्या घरी गेले होते. परंतु ते मुंबई गेल्याचे कळले. या अटकेमुळे भारतीय जनता पार्टीत खळबळ उडाली आहे.

नागपुरी गेटमध्ये 67 जणांना अटक

नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल ६ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आतापर्यत 67 नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये मौलवी व दोन्ही समुदयातील नागरिकांचा समावेश आहे. नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी अलीम पटेल, आरीफ हुसैन, खालीद पहेलवान, इमरान अशरफी, रहमत नदवी यांच्यासह शेकडो नागरिकांना अटक केली आहे.

5 लाख 15 हजाराचे नुकसान

12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमी या इस्लामिक संघटनेच्या वतीने त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे निदर्शन व निवेदन देण्याकरिता विना परवानगी मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा परत जात असताना, बाजारपेठेतील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या दगडफेक व तोडफोडीत 5 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

एक अधिकारी, आठ पोलीस अमंलदार जखमी

जमाव नियंत्रण करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दंगेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे एक पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीस अमंलदार जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थित आहे. यासोबतच या दगडफेक व जाळपोळीत दोन ते तीन नागरिकसुद्धा जखमी झाले.

अत्यावश्यक सेवेला दोन तास मुभा, इंटरनेट बंदच

दंगलीच्या घटनेनंतर संचारबंदी लागू झाली आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दरम्यान सोमवारी दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुध वाटपाकरिता तसेच शासकीय अथवा निमशासकीय विद्यार्थी परीक्षेच्या वेळेनुसार संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. यासंदर्भात पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आदेश जारी केले आहे. पंरतु इंटरनेट सेवा सोमवारीही बंद ठेवण्यात आली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button