Shivsena Vs Rane : महाआघाडी सरकारचे अनेक मंत्री तुरुंगात जाणार! | पुढारी

Shivsena Vs Rane : महाआघाडी सरकारचे अनेक मंत्री तुरुंगात जाणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आवाज नाही, धूर नाही असे फटाके आघाडी सरकारचे. धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच मिळतात. कलाबेन डेलकर यांची निशाणी धनुष्यबाण नव्हे तर फलंदाज ही होती. गद्दारी बनून मुख्यमंत्री बनले. केंद्रात धडक मारायची म्हणतात, पण डोकं ठिकाणावर नाही”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Shivsena Vs Rane) यांनी शिवसेनेवर केली.

नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, “गुणवत्ता नसताना मुख्यमंत्री पदावर टिकवल्यामुळे बारामतीच्या कार्यक्रमांत शरद पवारांचे तोंडभरून कौतुक होत आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री तुरुंगात जाणार आहेत. सत्ता तुमची असताना राज्यात ड्रग्ज येतातच कशी?”, अशी चौफेर टीका नारायण राणे यांनी केली आहे.

शिवसेनेने अग्रलेखातून काय म्हंटलं होतं?

वास्तविक गेल्या एक दीड वर्षात जी न भूतो इंधन दरवाढ झाली त्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत लाखो कोटींची भर पडली आहे तशी ही जनतेची केलेली लूटच आहे. तेव्हा सामान्य जनतेला दिलासाच द्यायचा होता तर तो समाधानकारक द्यायचा होता. पण त्यासाठी इंधन करकपात जास्त करावी लागली असती आणि ती करण्याचा मोठेपणा दाखवावा लागला असता ती सरकारने संधी गमावली आहे.

त्यामुळे इंधन दरकपात होऊनही आपल्या पदरात नेमके काय पडले याचा शोध जनता घेत आहे आणि तिकडे या दरकपातीमुळे एका वर्षात लाख कोटींचे नुकसान आपल्याला सोसावे लागणार असे म्हणून सरकार सुस्कारे सोडीत आहे. सरकारने काय ते सुस्कारे, उसासे सोडावेत पण आवाक्याबाहेरील इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेली महागाई यामुळे सामान्य जनतेचे जे आजवर नुकसान झाले आहे त्याचे काय? मुळात आधी भाव भरपूर वाढवायचे आणि मग किंचित कमी करून दिलासा, ‘दिवाळी गिफ्ट’ वगैरे गोष्टी करायच्या असा हा इंधन दरकपातीचा देखावा आहे”, असा टोला शिवसेनेने लगावला.

“तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी आरसा दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. ठीक आहे, पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला हेही नसे थोडके. अर्थात या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत मत परिवर्तन होईल अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार हे निश्चित आहे”, असं शिवसेनेनं (Shivsena Vs Rane) म्हटलं आहे.

Back to top button