खरे हिंदुत्ववादी कसले 'हे' तर आता नकली हिंदुत्ववादी; अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा | पुढारी

खरे हिंदुत्ववादी कसले 'हे' तर आता नकली हिंदुत्ववादी; अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: मलंग गड क्षेत्राला हिंदुत्ववादी दर्जा मिळावा म्हणून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्यावेळी नक्की प्रयत्न करू. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करू, आता सर्वधर्मियांचे हे ठिकाण असले तरी या क्षेत्राला हिंदुंचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे. शासन दरबारी तशी त्याची नोंद घेतली जावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. याआधी खरे हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे आता नकली हिंदुत्ववादी झाले आहेत, असा टोला शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलंग गडाच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

आनंद दिघे यांच्या प्रयत्नामुळे 39 वर्षापासून मलंग गडावरील माघी पौर्णिमा उत्सव सुरू झाला. ती परंपरा आजही शिवसैनिकांनी सुरू ठेवली आहे हे सांगताना खा. राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख टाळला. अनेक वर्षात याठिकाणी पाणी, रस्ते, फ्युनिक्युलर ट्रॉली, बस स्थानक सारख्या सुविधा निर्माण होणे गरजेचे होते. त्या निर्माण झाल्या नाहीत, अशी खंत शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येतील आणि त्याच हवाई वाहनाने निघून जातील. समस्या कायम राहतील असे सांगत येथे सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. अनेक वर्ष भाविक, ज्येष्ठ, वृध्द पायी गडावर जातात. यात्रेच्या काळात शिवसैनिकांना पायी जावे लागते. याचा या मंडळींनी विचार करावा. मलंग गडावर महाराजांचे दर्शन घेताना यांना चांगली बुध्दी येवो. शिवसैनिकांना किरकोळ कारणावरुन त्रास देण्याची आणि शिवसेनेच्या शाखांवर कब्जा करण्याचे प्रकार यांच्या हातून होऊ नयेत. अशी बुध्दी महाराजांना द्यावी, अशी खोचक टीका खा. विचारे यांनी शिंदे पिता-पुत्रावर केली.

ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर समुहाने गडावर जाऊन धार्मिक स्थळाचे दर्शन घेतले. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन मलंग गड यात्रेच्या निमित्ताने केले. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी दोन्हीकडच्या नेत्यांसह पोलिसांनी घेतली होती. भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा सूचना दोन्ही गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.

दरम्यान मलंगगडावर जाणाऱ्या फ्युनिक्युलरचे ट्रॉलीचे काम मागील 15 वर्षापासून रखडले आहे. या कामाचा ठेकेदार काम सोडून गेला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या रखडलेल्या कामाची गंभीर दखल घेऊन हे काम मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

Back to top button