'या' रेल्वेलाईनसाठी १.२० लाख जणांनी गमविला जीव | पुढारी

'या' रेल्वेलाईनसाठी १.२० लाख जणांनी गमविला जीव

बँकॉक; वृत्तसंस्था : जगभरातील इतिहासाच्या पानांत डोकावले तर काही दुःखदायक घटना समोर येतात की, त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान एक रेल्वे लाईन तयार करताना एक लाख २० हजार लोकांना जीव गमवावा लागला होता. या लाईनला ‘डेथ रेल्वे’ या नावाने ओळखले जाते. थायलंड आणि म्यानमारच्या रंगूनला जोडणारी ही रेल्वे लाईन ४१५ कि.मी. लांबीची आहे.

जपानने दुसऱ्या युद्धादरम्यान १९४२ मध्ये ही रेल्वे लाईन टाकण्याचा निर्णय घेतला होता. १९४२ मध्ये सुरू झालेल्या या लाईनचे काम १५ महिन्यांनी पूर्ण झाले. थायलंड, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आणि सिंगापूरसह आशियाई देशांतील एक लाख ८० हजार आणि मित्र देशांच्या ६० हजार कैद्यांना या कामासाठी अक्षरश: जुंपले होते. त्यात जीव गमवावा लागलेल्या एक लाख २० हजार मजुरांपैकी १६ हजार जणांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाला. युद्धानंतर या रेल्वे लाईनची दुरुस्ती करण्यात आली आणि रेल्वेगाडी सेवा सुरू करण्यात आली. सध्या कंचनबुरीच्या उत्तरेकडे नामटोकपर्यंत ही गाडी सुरू आहे.

Back to top button