वयाच्या तिशीनंतर ही घ्या काळजी; अन्यथा लवकर म्हातारे व्हाल
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लवकर म्हातारे होण्यास कुणालाच आवडणार नाही. उलट आपण जास्तीत जास्त सुंदर, तरुण दिसावे, अशी सर्वांची इच्छा असते. मात्र, त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, खाण्यावर नियंत्रण अशा गोष्टींच्या अटी असल्यामुळे अनेकांचे शरीर सुदृढ ठेवण्याचे संकल्प मनातच राहतात.
तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीरात वयाच्या तिशीनंतर बदल घडू लागतात. चयापचयाची क्रिया काहीशी मंद होऊ लागते. परिणामी, पुढील काही वर्षांत त्वचा व अन्य अवयवांवर परिणाम होऊ लागतो. एखादी व्यक्ती जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागते.
शरीरावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी मिठावर नियंत्रण, तेल, मसाला, चायनीज पदार्थ यावर बंधने घालणे आवश्यक आहे. साखर असलेले दही, आईस्क्रीम टाळणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला दिवसात पाच ग्रॅम मीठ पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाण झाल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. शीतपेयांमध्ये कर्करोगाला कारणीभूत रंग वापरले जातात. त्याशिवाय पुरुषांच्या शुक्राणूवरही परिणाम होतो. हानिकारक शीतपेयांमुळे महिलांनाही गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. बरचसे बेकरी पदार्थही शरीराला घातक असतात. फळे, सात्त्विक आहार, व्यायाम आदी चांगल्या सवयी बाळगल्यास शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.