जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू | पुढारी

जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मकर संक्रातीच्या दरम्यान पतंग उडविण्याचा जणू ध्यास लागलेला असतो. मात्र पतंग उडवताना अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असताना असाच अपघात होऊन १० वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवार, दि.15 रोजी घडली आहे. धरणगाव तालुक्यात दुपारी पतंग उडवताना एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज रविवार, दि.15 मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button