...तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाभागातील गावांवर हक्क सांगत त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या. त्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर तुमचा विचार करू. आमचा राज्यांशी वाद नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दिले. नाशिक येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सोलापूर येथे कर्नाटकातील संस्था उभ्या करण्याची घोषणा केली असेल. पण त्यांना सांगतो की, मुंबईमध्ये कानडी बांधवाना भवन उभारू दिली आहेत. आमचा काही वाद नाही, वाद तुम्ही निर्माण करता. सीमाभागातील गावांवर हक्क सांगत त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या. त्यासंदर्भात निर्णय होऊ दे, त्यानंतर तुमचा विचार करू, आमचा काही राज्यांशी वाद नाही. हा देश संघराज्य आहे, संस्थाने नाहीत. प्रत्येक राज्यांशी प्रेमाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. त्याचा आनंद आहे. मुंबईमध्ये अनेक राज्यांची भवन आहेत.
उत्तम शिव्या येत असतील, तर राज्यपालांना द्या. त्यांना शिव्या देणाऱ्यांवर फूले उधळू. शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर उदयनराजे यांनी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :