भारतात केवळ घुसखोरी नको, सीमेवर थेट हल्ला करा | पुढारी

भारतात केवळ घुसखोरी नको, सीमेवर थेट हल्ला करा

जम्मू; अनिल साक्षी : आता केवळ भारतात सीमेवरून घुसखोरी करू नका, तर थेट सीमेवर हल्ले चढवा, असे आदेश पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने दहशतवाद्यांना दिल्याने भारतीय सुरक्षा दले सज्ज झाली आहेत. सीमेलगत कोणीही संशयित दिसला, तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश भारतीय सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत.

कडक हिवाळा आणि बर्फवृष्टी सुरू होण्याआधी पाकिस्तानातून दहशतवादी मोठ्या संख्येने भारतात घुसखोरी करत असतात, हे वेळोवेळी समोर आले आहे. सध्याचा कालावधी हा घुसखोरीचा मानला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएसआय’प्रमुखांनी ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’ला थेट भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांवर व भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सीमेवर काही घटनाही घडल्या आहेत. याबाबत पाकिस्तानने या गोळीबारात आपला हात नसल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात घुसखोरीची वाट पाहत असलेल्या दहशतवाद्यांच्या टोळ्यांचे हे कृत्य असण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांचे हे मनसुबे समोर आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क बनल्या असून, सीमेवरील तैनात तुकड्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सीमेलगत कोणीही संशयित दिसला, तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. हिरानगर सेक्टरमध्ये दोनवेळा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारतपाक सीमेच्या कुंपणाजवळ आलेल्या संशयितांवर गोळीबार करून त्यांना पळवून लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

Back to top button