कोल्हापूर : तिने एक नाही, दोन नाही तर तब्बल ४०० पेक्षा अधिक सापांना दिले जीवदान! | पुढारी

कोल्हापूर : तिने एक नाही, दोन नाही तर तब्बल ४०० पेक्षा अधिक सापांना दिले जीवदान!

पुढारी ऑनलाईन डेस्क: साप म्हटलं की, भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. आपल्याला माहित आहे का? प्रत्येक साप हा विषारी नसतो; पण  साप दिसला की तो विषारी, अपायकारक म्हणूनच आपण त्याच्या जीवावर उठतो. साप हा आपल्या जैवविविधता साखळीतील एक जीव आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोल्हापूरातील अशाच एक सर्पमैत्रीण आहे, जिला सापांबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. सापांची तिला अजिबात भीती वाटत नाही. साप वाचवण्यासाठी गेले १६ वर्षांपासून काम करत आहेत कोल्हापुरच्या सर्पमैत्रीण सारिका बकरे…

सर्पमैत्रिण सारिका बकरे
सर्पमैत्रिण सारिका बकरे

पूर्ण कुटुंबच सर्पमित्र

कोकणकन्या असलेल्या सारिका लग्नानंतर कोल्हापूरकर झाल्या. मुळातच धाडसी स्वभाव असलेल्या सारिका लग्नानंतर सराईतपणे साप पकडायला शिकल्या त्या त्यांच्या पतीच्या मदतीने. लग्नानंतर पर्यावरणप्रेमी आणि सर्पमित्र असेलेले पती सागर बकरे यांनी सारिका यांचा धाडसी स्वभाव, कुतूहल आणि या क्षेत्रात काम करण्याची तयारी पाहून वेळोवेळी तिला प्रोत्साहन दिलं. आज त्या सराईतपणे साप पकडून त्यांना जीवदान देतात. सारिका आणि सागर यांचा मुलगा वसुमित्र हा सुद्धा साप पकडायला शिकला आहे.

२०१९ च्‍या काेल्‍हापूरातील महापुरात विषेश कार्य

२०१९ चा महापुर आठवला तरी अंगावर शहारे येतात. महापुरावेळी सारिका बकरे यांचे काम उल्लेखनीय  ठरले. २०१९ च्या महापुरात  त्‍यांनी आपला बुडता व्यवसाय बाजूला ठेवून सापांना जीवदान दिलं.

सारिका यांचं कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी भागातील शॉपला महापुराचा फटका बसला. पुराच्या पाण्याची पातळी सुमारे सहा फूट होती. तेव्हा शॉपमध्ये सात-आठ दिवसापर्यंत पाणी साठून राहिलं होतं. या पुराच्या पाण्यामुळे शॉपमधील मशीन, स्टॉक आणि तयार मटेरियल यांचं सुमारे चौदा पंधरा लाखांचे नुकसान झाले. तेव्हा नुकसान होत आहे हे पाहत राहण्या पलीकडे काही करता येत नव्हतं. व्यवसायाबरोबरच आमचं राहतं अपार्टमेंट देखील पाण्यानं वेढलं होतं. कोल्हापुरातील अनेकांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं.

२००५ साली आलेल्या महापूरच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्य केलं होतं. हातावर हात ठेऊन रडत बसण्यापेक्षा या अनुभवाचा उपयोग त्यांनी लोकांच्या मदतीसाठी करायचं ठरवलं. पूरपरिस्थितीमधील लोकांना बाहेर काढणं, गरजेचे उपयोगी साहित्य पोहचवणं, अशी कामं पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये टीमसोबत सारिका यांनी केले. पाणी उतरू लागलं, तसे लोक घरी परतू लागले. तेव्हा लोकांना सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे घरात आलेले वन्यजीव दूर करण्याचे. या वन्यजीवांमध्ये प्रामुख्याने सापांचे प्रमाण खूपच जास्त होते. पण अशा परिस्थितीमध्ये एक-दोघांनी काम करून ही स्थिती आटोक्यात येणारी नव्हती. यावेळी सारिका व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हाट्सॲपच्या माध्यमातून एकत्र येत मदतकार्याला सुरूवात केली. सर्व शहराच्या सर्व भागातील, उपनगरातील, जवळच्या गावातील सर्पमित्रांचा ग्रुपच्या माध्यमातून पूर परिस्थितीमध्ये हजारो साप आणि वन्यजीवांना तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांना जीवदान देण्याचं काम केले.

पकडून ठेवलेले साप योग्य अधिवासात सोडले

रपरिस्थितीमध्ये अनेक साप त्यांनी त्यांच्या घरातच बरणी बंद करून ठेवले होते. यानंतर पूरपरिस्थिती पूर्ण निवळल्यावर सापांना योग्य आधिवासात सोडण्यात आले. अजूनही हा सर्पमित्रांचा ग्रुप अविरत कार्यरत आहे. या कार्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत या ग्रुपचे सत्कार देखील करण्यात आला होता.

आत्तापर्यंत ४00 पेक्षा अधिक सर्पाना जीवदान

सारिका यांनी आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक सर्पाना जीवदान दिलं आहे. आज परिसरात कुठेही साप आला की, विश्वासाने सारिका बकरे यांना बोलवलं जातं. कारण लोकांना त्यांचा साप पकडण्यासाचा हातखंडा समजला आहे.

सर्पजीवदानाबरोबरच जनजागृतीही

सारिका फक्त सापांना जीवदानच देत नाहीत, तर त्या सापांबद्दल जनजागृतीसुद्धा करतात. पर्यावरणप्रेमी असलेल्या सारिका यांनी जनजागृतीची सुरुवात ही आपल्या जवळच्या माणसांपासून केली. जिथे जिथे साप पकडायला बोलवत तिथे सापांच्याबद्दल असलेले गैरसमज त्या तेथ[ल लोकांना सांगू लागल्या. त्यांना सापाचे निर्गातील स्थानाबद्दल पटवून देऊ लागल्या.  तसेच त्या विविध संस्थाच्या माध्यमातून शाळा, विविध संस्थामध्ये जाऊन त्या जनजागृती करू लागल्या.

मला सापांबद्दल पाहिल्यापासूनच कुतुहुल होतं. त्यामुळे साप पकडतांना भीती नाही वाटत. साप आपल्यासारखाच एक जीव आहे आणि आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. लोकांनी त्याच्याबद्दल गैरसमज, अंधश्रद्धा न बाळगता त्यांना जीवदान दिलं पाहिजे.

सर्पमैत्रीण सारिका बकरे

Back to top button