पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नाला पंख दिले : गृहमंत्री अमित शहा | पुढारी

पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नाला पंख दिले : गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मागील आठ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षेला व स्वप्नाला पंख दिले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि.३० मे) काढले. केंद्रातील मोदी सरकारच्या स्थापनेला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांनी आठ वर्षाच्या काळात ज्या पद्धतीने काम केले आहे, त्यामुळे प्रत्येक घटकांत त्यांच्या प्रती विश्वास आणि अभिमान निर्माण झाला आहे, असे सांगून शहा पुढे म्हणतात की, मोदी यांनी सत्तेला सदैव सेवेचे माध्यम मानले. गरीब वर्ग, शेतकरी, महिला आणि वंचित-शोषितांना त्यांचा हक्क मिळवून दिला. लोकशाही प्रती लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. लोकशाही प्रक्रियेत तसेच देशाच्या विकासात त्यांना सामील करून घेतले. मोदी यांच्या रूपाने देशाला कणखर नेतृत्व लाभले. १३० कोटी जनतेच्या विश्वासावर देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. मागील आठ वर्षे सरकारवर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचेही आभार मानतो.

पंतप्रधान मोदी यांनी देशाला केवळ सुरक्षितच बनविले असे नाही तर विविध क्षेत्रांच्या बाबतीत त्यांनी धाडसी निर्णय घेतले. तंत्रज्ञान अथवा क्रीडा क्षेत्र असो, आरोग्य वा संरक्षण क्षेत्र असो किंवा गरिबांचे कल्याण असो प्रत्येक बाबतीत मोदी यांनी जगासमोर आदर्श घालून देणारे काम केले आहे. संकटाचे रूपांतरण संधीत कसे करायचे, हेही मोदी यांनी जगाला दाखवून दिले. जम्मू काश्मीर, ईशान्येकडील राज्यांतील समस्या आणि नक्षलवादावर मोदी यांनी असे काही काम केले आहे की त्यामुळे शांतीचे नवे पर्व सुरु झाले आहे, असेही अमित शहा यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का?

Back to top button