सांगली : जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून मुलाकडून जन्मदात्या आईचा खून | पुढारी

सांगली : जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

नागज (सांगली), पुढारी वृत्तसेवा : जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईचा दारूड्या मुलानेच लोखंडी फुकणी, दगड व विटांनी मारहाण करून खून केला असल्याची घटना आगळगाव (ता.कवठेमहांकाळ) येथे बुधवारी (दि.०४) सायंकाळी घडली. राजाक्का ज्ञानू जाधव (वय ७०, रा.पाटील मळा आगळगाव) हिचा खून झाला असून याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव ( वय ५०) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी, दशरथ हा दारूच्या आहारी गेला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याची आई काबाडकष्ट करून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा सांभाळ करत होती. सध्या त्याची दोन्ही मुले परगावी असल्याने, तो व आई हे दोघेच आगळगावच्या दक्षिणेला असलेल्या पाटील मळ्यात राहत होते. दरम्यान बुधवारी (दि.०४) दुपारपासून दशरथ दारू पिऊन घरात आईला मारहाण करत होता. आज तुला जिवंत ठेवत नाही असे तो वारंवार म्हणत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने पुन्हा लोखंडी फुकणी व दगडाने आईला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

या घटनेची माहिती गणेश विठ्ठल भोसले ( वय २६, रा.रांजणी) या तिच्या नातवाला (मुलीचा मुलगा) शेजारच्या लोकांनी फोनवरून सांगितली. त्याने तात्काळ घटनास्थळी येऊन आजीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, गणेश भोसले यांनी गुरूवारी सकाळी या घटनेबाबात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी जाऊन, आरोपी दशरथ जाधव याला बुधवारी (दि.०४) रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button