शांतता बिघडवण्यासाठी सुपारी देण्यात आलीय; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
पुढारी ऑनलाईन डेस्क : “फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरी मशीद पाडत होते का? याआधीही अनेकांनी अल्टिमेटम दिलेले आहे. अल्टिमेटमवर देश चालत नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. शांतता बिघडवण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. सुपारी देणाऱ्यांचा सरकारने शोध घेतला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. धमक्या देणाऱ्यांची ताकद नाही. कुणीही राज्याची कायदा व सुव्यसस्था बिघडवू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम आहेत.”, असे टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची जोरदार टीका
“महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे वाटले होते, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्राने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे गदाधारी कोण आणि ‘गधा’धारी कोण हे महाराष्ट्र दिनी स्पष्ट झाले,” असा टोला लगावतच शिवसेनेनं भाजपा आणि मनसेवर निशाणा साधलाय. “भाजपाच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर संभाजीनगरच्या सभेत त्यांचे उपवस्त्र श्री. शरद पवारांवर तुटून पडले. हे ठरवून झाले. त्यातून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळाले? उपवस्त्राला बुस्टर देण्याचे काम मुंबईतूनच सुरू होते. पण भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज आहे.”
“बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. बाबरी कोसळली आहे व श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे ही समस्त हिंदू जनांसाठी अभिमानाची बाब आहे, पण आता देशात सगळ्यांना सुखी ठेवणारे ‘रामराज्य’ आणायला हवे असे या लोकांना का वाटत नाही? फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही.”
“शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल. बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपाच्या वतीने स्पष्ट केले की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे. भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते.”
“फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे. मुख्य म्हणजे तेव्हाचे अयोध्या लढ्याचे सेनापती श्री. लालकृष्ण आडवाणी यांनीही ‘बाबरी आम्ही पाडली नाही. बाबरी पडल्याचे कळताच मला धक्का बसला. तो आमच्यासाठी काळा दिवस होता,’ असे स्पष्ट केले होते. त्या काळ्या दिवसासाठी भाजपा आता श्रेय का घेत आहे? व त्यांच्या उपवस्त्रास अयोध्येत का पाठवत आहे? भारतीय जनता पक्षाचे काही सांगता येत नाही. बाबरीचा ढांचा पाडला हे एक राष्ट्रीय कार्यच होते व त्याच्या श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब?”
“योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचे मत होते. आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल.”
“मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्यावर केंद्र सरकारला एक धोरण आखावे लागेल. बेकायदेशीर काही होत असेल तर ते रोखणे हे राज्य सरकारचे काम आहे, पण भोंग्यांच्या प्रश्नावर भाजपाच्या उपवस्त्रांना दोन सभा घ्याव्या लागतात, लोकांना भडकविण्याची भाषा करावी लागते. म्हणजे भाजपास वैफल्याने ग्रासले आहे व फक्त धार्मिक तणाव निर्माण करायचा आहे. हिंदू-मुसलमानांतील दंग्यांनी आजवर दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजपा व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे.”
“फडणवीस म्हणतात, ‘बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता.’ शिवसेनेने घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपावाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्यापासून कोणाची कशी हातभर फाटली आहे ते देशाने पाहिले आहे. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ‘‘आम्ही येथून बाहेर पडणार नाही!’’ मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे”, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.
पहा व्हिडिओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात