#InternationalTigerDay : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष वाढतोय | पुढारी

#InternationalTigerDay : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष वाढतोय

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : #InternationalTigerDay : चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये १११ वाघ होते ते वाढून २०२० मध्ये संख्या २४६+ झाली असून ती २०२१ अखेर ३०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
जंगलात गावकऱ्याचा वाढता हस्तक्षेप ,गरिबी, रोजगाराच्या अभावी जंगलतोड ,अतिक्रमण, विकासकामे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वण्यजीव-मानव संघर्षात वाढ होत आहे. मानवावरील हल्यात आणि मृत्यूत सतत वाढ होत आहे. २००६ पासून सुरु झालेला वाघ मानव संघर्ष वर्षागणिक वाढतच आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात २६ वाघ आणि १२२ मानवी मृत्यू झाले आहेत.
२००६ मध्ये केवळ ९ संघर्षाच्या घटना घडल्या होत्या. त्या वाढून २०१८ मध्ये ९१७ पर्यंत वाढल्या. ह्यातील सर्वाधिक ५५ % घटना ब्रम्हपुरी, २५ % चंद्रपूर आणि २० % घटना सेन्ट्रल चांदा विभागात घडल्या.
वन्यजीव आणि मानव दोघांचेही प्राण वाचवायचे असेल तर वन् विभाग, ग्रामीण नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पुढारी ह्यांनी एकत्र येवूनच ह्या समस्येवर मात करता येइल असे मत ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्याघ्र दिनानिमित्य व्यक्त केले आहे.
हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या ,विकास, रोजगारीचा अभाव ह्यामुळे ग्रामीण लोकांची जंगलावरील अवलंबिता वाढली आहे.
जवळ-जवळ ८०० गाव जंगलात किंवा परिसरात आहेत, त्यामुळे वाढत्या वाघ-वन्यजीवांचा त्रास शेतकरी आणी नागरीकांना होतो आहे तशीच समस्या वण्यजीवाची सुधा आहे. जिल्ह्यात वेकोली च्या खाणी आणि अनेक उद्योग आहेत त्यामुळे वाघ -वन्यजीवांचे अधिवास, भ्रमण मार्ग बाधित झाले असल्यामुळे वन्यजीव-वाघ-मानव संघर्षात वाढ झाली आहे.
केवळ चंद्रपूर शहराजवळ २१ वाघ आहेत, चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० पिलांच्या वाघीन, ३७ बछडे आणि ४१ लहान वयस्क वाघ आहेत. ह्यावरून वाघांच्या संखेत किती वाढ झाली हे लक्षात येते. वाघांच्या वाढीमुळेच ताडोबातील वाघ विविध मार्गे महाराष्ट्रभर जात आहे. त्यातूनही त्या ठिकाणी वाघ-मानव संघर्ष उदभवत आहेत.

#InternationalTigerDay :  चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची अधिकृत संख्या

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दशकात वाघांची संख्या वाढली आहे, ती पुन्हा वाढतच आहे. या  वर्षाअखेर ही संख्या ३०० च्या जवळ असेल असे वनविभागाचे मत आहे. ही संख्या सुद्धा वाघ-मानव संघर्ष वाढन्यास कारणीभूत आहे.
ताडोबा आणि प्रादेशिक मिळून वाघांची संख्या २०१४ मध्ये १११ होती,२०१५ – १२१, २०१६ -१२८ , २०१७ – १५२ ,२०१८ – १६० ,२०१९ – २२१, २०२० -२४६ इतकी प्रचंड वाढली. पूर्वी ताडोबातील वाघांची संख्या प्रादेशिक पेक्षा जास्त असायची परंतु २०१७ च्या पुढे ह्यात बदल झाला असून प्रादेशिक जंगलातील वाघांची संख्या ताडोबापेक्षा वाढली.
२०१७ मध्ये ताडोबात ७५ वाघ तर प्रादेशिक मध्ये ७७ वाघ होते. २०१९ मध्ये ताडोबात १०६ तर प्रादेशिक मध्ये ११५ वाघ , २०२० मध्ये ताडोबात १०६ वाघ तर प्रादेशिक मध्ये १४० वाघ आढळले. आकडेवारीवरून संरक्षित जंगलापेक्षा असंरक्षित जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशन ,औद्योगिक आणि ग्रामीण भागात सुद्धा वाघांनी आपले तात्पुरते अधिवास बनविलेले आहे.

#InternationalTigerDay : वाघ-मानव संघर्शात मानवी मृत्य वाढत आहेत

२०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हमल्यात  ९ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ८ ,२०१६ मध्ये १७ ,२०१७ मध्ये १७ ,२०१८ मध्ये २७ ,२०१९ मध्ये २५ ,२०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ३१ लोकांचा वण्यजीवांमुळे मृत्यू झाला आहे.
२०१४ ते २०२१ दरम्यान १६७ लोक मृत्युमुखी पडले असून ह्यात वाघांमुळे १२२ तर इतर प्राण्यांमुळे ४५ गावकऱ्याचा मृत्यू झालां आहे. वयाघ्र प्रकल्पात ३५ आणि प्रादेशिक मध्ये १३२ लोकांचा मृत्यू झाला होता. हा आलेख पाहता दर वर्षी मानवी मृत्यूत वाढ होताना दिसत आहेत. ह्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात सुधा घडतो आहे. ह्यात मृत्युमुखी पडनाऱ्यात गुराख्यांचा समावेश जास्त आहे.

#InternationalTigerDay : वाघ-मानव संघर्षात वाघांचा मृत्यू

२०१४ ते २०२१ ह्या सात वर्षात नैसर्गिक,अपघात आणि शिकार अश्या घटनात एकूण ६४ वाघांचा मृत्यू झाला असून नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ , अपघातात ११ वाघ , आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात येते.
ह्या घटना पाहता २०१९ आणि २०२० ह्या दोन वर्षात शिकारी मुळे १० वाघांचा मृत्यू झाला ही घटना ह्या संघर्षाचे वाढते स्वरूप विषद करते. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक,वन्यजीव  ह्यांनी जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ञांची वेबिणार द्वारा बैठक घेतली आणि सुचना मागविल्या.

#InternationalTigerDay :  संघर्ष कमी करण्यासाठी उपाय योजना

वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची संख्या, हल्यात मानवी मृत्यू ,शेतीचे नुकसान ,जंगलतोड आणि मानवाचा  जंगलातील हस्तक्षेपामुळे वाघ-मानव संघर्ष वाढतो आहे .वाघ, वन्यजीव आणि मानव ह्यांचे अस्तित्व महत्वाचे असुन त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय ह्यावर चिंतन झाले पाहिजे.
यासाठी दीर्घकालीन आणि लघु कालीन उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. वन जमिनीवर आणि वाघांच्या भ्रमन मार्गात वनीकरण,गवताळ प्रदेश वाढविणे, जलसाठे तयार करणे, गावाजवळ मोह ,फळझाडे आणि तेंदू झाडांची लागवड करणे,गावे आंनी शेतीसाठी सोलार कुंपण, गावांची जंगलावरील अवलंबिता कमी करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे, जंगलातील रस्त्यांना आतून वन्यजीव मार्ग देणे, वनशेतीला चालना देणे आणि वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापण करणे इत्यादी अनेक स्थायी उपाय योजना आवश्यक आहेत.
सोबत लघु कालीन उपाय योजना जसे हल्ले करणाऱ्या आणि अगदी गावाजवळ असलेल्या वाघ,बिबट,अस्वल ह्यांना त्वरित पकडण्याची परवानगी मिळणे आणि योग्य अभयारण्यात सोडणे,लोकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करणे ,जंगलात चराईवर नियंत्रण, वन विभागाचे नियमित निरिक्षन ठेवणे ,स्थानिक नेते आनि गावकऱ्याचे संवर्धनासाठी मन वळविणे, जिल्हा परिषद आणि वन विभागातर्फे ग्रामीण भागात गरिबी दूर करणे इ अनेक विकासाच्या विविध योजना राबवविणे अश्या अनेक उपाय योजना राबविल्यास वाघ-मानव संघर्ष निश्चित कमी करता येईल अश्या उपाययोजना ताडोबा क्रीटीकल वाइल्डलाईफ हेबिटट कमिटीचे सदस्य प्रा सुरेश चोपणे ह्यांनी वन विभागाला सुचविल्या आहेत
हे ही वाचलं का?  

Back to top button