पावसाळ्यात ओला मास्क का वापरु नये? जाणून घ्या कारणे
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पावसाळ्यात मास्क वापरताना पावसाने झालेला ओला मास्क हा व्यक्तीचा संसर्गापासून अजिबात बचाव करू शकत नाही किंवा फारसा प्रभावी राहत नाही. म्हणून तो तत्काळ बदलणे हिताचे ठरू शकते.
पावसाळ्याचे आगमन होतानाच देशभरात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या अवताराने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क परिधान करणे हा अक्सीर इलाज असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापि, पावसाळ्याच्या दिवसांत मास्कबाबत अधिक खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे मास्क ओला झाला आणि तो तसाच वापरला तर कोरोनापासून बचाव करणे दूरच; पण आपल्याला अन्य संसर्गाला सामोरे जावे लागेल, तेही फंगस इन्फेशनला. त्यामुळे मास्क कोरडा राहण्याबाबत सजग राहणे अपेक्षित आहे.
घराबाहेर पडताना किमान दोन मास्क बाळगणे गरजेचे आहे. चारचाकी वाहन असेल तर मास्क भिजण्याचा प्रयत्न नाही. परंतु, दुचाकीवरून जाताना मास्क ओला झाला तर तो लगेच बदलावा. सध्याच्या काळात मास्कबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊ या.
मास्क ओला झाल्यास
सध्याच्या काळात पाऊस कधीही येऊ शकतो. अशावेळी काही तासांतच पावसाळ्यात मास्क ओला होऊ शकतो. म्हणून घराबाहेर पडणार्या मंडळींनी दोन ते तीन तासांनी मास्क बदलत राहणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणार्या लोकांनी तीन ते चार मास्क जवळ बाळगावेत.
संसर्गाचा धोका : फंगल बॅक्टेरिया वाढण्यास पावसाळी वातावरण पोषक असते. तोंडावर लावलेला मास्क ओला झाला आणि तो जास्त काळ तसाच राहिल्यास त्यातून फंगल इन्फेक्शन वाढू शकते. हे विषाणू मास्कच्या माध्यमातून नाकात प्रवेश करतात.
सध्याच्या काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ओल्या मास्कमुळे तयार झालेले फंगल इन्फेक्शन हे आपल्या फुफ्सुसापर्यंत पोहोचून शरीराला आजारी पाडू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओला मास्क हा व्यक्तीचा संसर्गापासून अजिबात बचाव करू शकत नाही किंवा फारसा प्रभावी राहत नाही. म्हणून तो तत्काळ बदलणे हिताचे ठरू शकते.
उन्हात कोरडा करा मास्क : फंगल विषाणूला थारा मिळू नये, यासाठी मास्कला काही वेळ उन्हात ठेवायला हवे. सामान्य वातावरणात देखील खराब किंवा ओला मास्क वापरू नये.
त्यामुळे किमान दोन-तीन मास्क असणे गरजेचे आहे. एकाचा वापर झाल्यानंतर दुसरा उन्हात वाळवता येऊ शकतो. जर आपण डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर तो आठ तासांनी बदलणे गरजेचे आहे.
डबल मास्क सुरक्षित : संसर्गापासून वाचण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. पावसाळी वातावरणामुळे वरचा मास्क ओला होण्याची शक्यता अधिक राहते.
त्यामुळे आतील मास्क हा सुरक्षित आणि कोरडा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी वरचा मास्क काढून ठेवला तरी आतला मास्क संसर्गापासून बचाव करण्याचे काम करतो.
मास्कची स्थिती कशी पाहवी?
कपड्याचा साधा मास्क : मास्कवर पाणी टाका आणि ते पाण्याला शोषून घेईल.
तीन लेअरचा मास्क : त्यावर पाणी पडल्यास ते पाणी आतपर्यंत जात नाही. मास्कच्या आतील लेअर कमी ओले होईल.
सर्जिकल मास्क : यावर पाणी टाकले तर सर्जिकल मास्क हा आतमध्ये पाणीच जाऊ देत नाही.
डॉ. संजय गायकवाड