Virat Kohli : विराटच्या राजीनाम्यानंतर धोनीची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली | पुढारी

Virat Kohli : विराटच्या राजीनाम्यानंतर धोनीची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. विराटच्या या निर्णयामुळे सारे क्रिकेट विश्व हादरले.

मागच्याच वर्षी टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर तो टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. तर द. आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद हिरावून घेत रोहित शर्माकडे बहाल करण्यात आले. त्यातच द. आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत विराट ब्रिगेडच्या पदरी अपयश आले. कसोटी मालिका 2-1 ने गमवावी लागली. याच बरोबर डब्ल्यूटीसीच्या गुणपालिकेत टीम इंडिया पहिल्या चार क्रमांकामधून बाहेर पडली आणि पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. यामुळे भारतीय संघाचे डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Virat Kohli)

(Virat Kohli) विराटच्या या निर्णयानंतर महेंद्रसिंग धोनीची एक भविष्यवाणी खरी ठरली आहे. विभाजित कर्णधारपद भारतासाठी योग्य नाही हे मान्य करून धोनीने २०१७ मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पुण्यात मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत एमएस धोनी म्हणाला होता, ‘विभाजित कर्णधारपद भारतात काम करत नाही. माझ्यासाठी पुढे जाण्याची हीच योग्य वेळ होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरेल.’

2014-15 च्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान धोनीच्या अचानक निवृत्तीनंतर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार झाला. यामुळे विभाजित कर्णधारपदाचा मार्ग मोकळा झाला, परंतु त्यानंतर टी20, वनडे फॉरमॅटमध्ये भारताला अनुकूल निकाल मिळाले नाहीत. 2015 च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आणि मायदेशात 2016 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला. मात्र, विराट कोहलीने बलाढ्य कसोटी संघ बनवला, तो क्रमांक एक वर कायम ठेवला.

महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की, 2015 च्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील वनडे मालिकेतील पराभवापूर्वी, जेव्हा त्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका झाली होती, तेव्हा त्याला हे उमगले होते की विभाजित कर्णधार भारतात काम करत नाही.

धोनी म्हणाला होता, ‘माझा विभाजित कर्णधारपदावर विश्वास नाही. संघासाठी एकच नेतृत्व असले पाहिजे. विभाजित कर्णधार भारतात काम करत नाही, मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. मला विराटच्या नेतृत्वात सहजता हवी होती. तिथे कोणताही चुकीचा निर्णय नाही. कसोटी, वनडे, टी20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता या संघात आहे. मला वाटले की पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली होती. (Virat Kohli)

2007 च्या अखेरीपासून जवळपास एक वर्ष भारताच्या वनडे, टी20 आणि कसोटी संघासाठी वेगळे कर्णधार असायचे. 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर राहुल द्रविडने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. महेंद्रसिंग धोनीची T20 आणि ODI कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर अनिल कुंबळेने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली. नोव्हेंबर 2008 मध्ये निवृत्ती होईपर्यंत कुंबळे कसोटी कर्णधार राहिला.

हेही वाचलत का?

Back to top button