
पुढारी ऑनलाईन डेस्क : जेव्हा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर भारत चंद्रावर पोहोचल्याची बातमी पाहतो आणि अवघ्या दोन सेकंदांनंतर कराचीत उघड्या गटारात पडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी येते. कराचीत उघड्या गटारांमुळे लहान मुलांचा बळी जात आहे, तर दुसरीकडे भारत चंद्रावर पोहोचला आहे, अशा शब्दांमध्ये पाकिस्तानमधील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) चे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी संसदेत वास्तव मांडले. यावेळी त्यांनी भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे मन:पूर्वक कौतुकही केले.
संसदेत बोलताना सय्यद मुस्तफा कमाल म्हणाले की,'आज जग चंद्राकडे वाटचाल करत असताना कराचीतील गटारात पडून आमची मुले मरत आहेत. जेव्हा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर भारत चंद्रावर पोहोचल्याची बातमी पाहतो आणि अवघ्या दोन सेकंदांनंतर कराचीत उघड्या गटारात पडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी येते. कराची शहर हे पाकिस्तानचे महसूल मिळवून देणारे इंजिन आहे. या देशात दोन दोन बंदरे आहेत. एक प्रकारे हे शहर देशाचे प्रवेशद्वार आहे. असे असताना या शहराला मागील १५ वर्षांपासून शुद्ध पाणी मिळालेले नाही. पाणी येते तेव्हा टँकर माफियांकडून त्यावर कब्जा केला जातो, अशी खंतही त्यांनी मांडली.
संसदेत बोलताना एका अहवाला चा हवाला देत सय्यद मुस्तफा कमाल म्हणाले, 'सिंध प्रांतात सुमारे 70 लाख मुले शाळेत जात नाहीत. संपूर्ण देशाचा विचार करता ही आकडेवारी २५ दक्षलक्ष इतकी आहे. कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. आमच्याकडे एकूण 48 हजार शाळा आहेत, परंतु यापैकी 11 हजार शाळा रिकाम्या असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. देशातील २.६२ कोटी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. हे वास्तव समजल्यानंतर देशातील नेत्यांची झोप उडाली पाहिजे होती. असा खडेबोलही त्यांनी सुनावले.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील विरोधी पक्ष नेते मौलाना फजलुर रहमान यांनी भारताशी तुलना करताना पाकिस्तानच्या मागसलेपणावर बोट ठेवले होते. ते मौलाना फजलुर रहमान म्हणाले होते की, 'भारत आणि पाकिस्तानला एकत्र स्वातंत्र्य मिळाले, पण आज ते (भारत) महासत्ता बनण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही स्वप्न पाहत आहोत आणि आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत.
हेही वाचा :