इंडोनेशियातील विनाशकारी भूकंपामध्ये ८०० मृत्यूमुखी
जकार्ता (इंडोनेशिया) : पुढारी ऑनलाईन
इंडोनेशियामध्ये सुलावेसी बेटावर आलेल्या विनाशकारी भूंकपामध्ये मृतांची संख्या ८०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. इंडोनेशियामध्ये तब्बल ७.५ रिश्टर स्केल काल भूंकप झाला होता. या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे आणखी वाताहत झाली. त्सुनामीमुळे सहा मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या.
बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्सुनामीमुळे किनारपट्टीवर असलेल्या पालू शहराची पूर्ण वाताहत झाली आहे. साडे तीन लाख लोकवस्ती असलेल्या या शहरामधील प्रत्येक घरामध्ये पाणी शिरले. सर्वाधिक जीवीत आणि वित्तहानी पालू शहरात झाली आहे.
मृतांमध्ये विदेशी पर्यटक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रतिकुल परिस्थितीमुळे बचावकार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विनाशकारी भूकंपामुळे वीजपुरवठा आणि दुरसंचार सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोदो भूंकपग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाल्याने बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर आणि व्यावसायिक विमानांचा वापर करण्यात येत आहे.