प्रवासादरम्यान 'या' गोष्टींची घ्या काळजी
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
प्रवास करुन आल्यानंतर अनेक लोकांना थकवा जाणवतो. वजन वाढणे किंवा कमी होणे याप्रकारच्या तक्रारी जास्त असतात. तर काही लोक वातावरण सहन न झाल्याने प्रवासानंतर लगेच आजारी पडतात. त्यामुळे प्रवासाचा सर्व आनंद निघून जातो. याशिवाय अनेक ठिकाणी जेवण वेगवेगळे असल्याने जेवणाचे पूर्ण वेळापत्रक बिघडते. यासाठी कधी उपाशी राहून तर कधी फास्ट फूड, स्नॅक्स खाऊन पोट भरावे लागते. परंतु, हे आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे. त्यामुळे कोणत्याही हवामानात प्रवासाचे नियोजन करत असाल, तर या काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवा. आज २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. म्हणून प्रवासा दरम्यान कशाप्रकारे काळजी घ्यावी यानिमित्त काही ‘टीप्स्ंं’
चालत जाणे फायदेशीर
सुट्ट्या म्हणजे मजा करणे तर असतेच. परंतु, त्यासोबत स्वतःला तंदुरुस्त ठेवणेही तेवढेच गरजेचे असते. त्यामुळे आवडत्या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी कॅब किंवा टॅक्सी बुक करण्यापेक्षा, ते ठिकाण जास्त दूर नसेल तर त्याठिकाणी चालत जावे. यामुळे प्रवासादरम्यान इतर जागाही पाहता येतात. तसेच चालत गेल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि उत्साही राहाल.
पाण्याची बाटली सोबत ठेवा
प्रवासादरम्यान कोणताही ऋतू असेल तरी नियमितपणे पाणी पीत राहा. कारण यामुळे आपले शरीर हाइड्रेड राहते. यासाठी प्रवासात पाण्याची लहान बाटली सोबत ठेवावी. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेता येत नाही.
संतुलित आहार घ्या
प्रवास करण्यादरम्यान अनेक वेळा आपल्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक बिघडते. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे हेल्दी स्नॅक खाऊन आपण आपली भूक मिटवू शकतो. त्यासाठी चिप्स, मॅगी, चॉकलेट याऐवजी शेंगदाणे, प्रोटीन बार, पॉपकॉर्न यासारख्या स्नॅक्सचे सेवन करा. हे आहार आपली भूक मिटवण्यासोबतच आपल्या शरीरासाठीसुद्धा अधिक फायदेशीर ठरते.
शक्य असल्यास स्वतः जेवण बनवा
बहुतांश ठिकाणी पर्यंटकांसाठी होमस्टे किंवा वसतीगृहाच्या सुविधा असतात. त्यामुळे त्याठिकाणी राहण्यासोबत आपण स्वतः जेवण बनवू शकतो. तसेच यामुळे आपल्याला आरोग्यासाठी चांगले आणि स्वस्त जेवण मिळते. विदेशात जाण्यादरम्यान आहाराच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी आपण याद्वारे दूर करू शकतो.
नाश्ता करणे टाळू नये
सकाळी केलेला हेल्दी नाश्ता तुम्हाला संपूर्ण दिवस तंदुरुस्त ठेवते. त्यानंतर दुपारचे आणि रात्रीचे जेवण न केल्यासही नाश्ता त्याची कमी पूर्ण करतो. तसेच नाश्त्यामध्ये अंडी, फळे, फळांचा रस या आहारांचा शक्यतो समावेश करावा.
दिवसातून एकवेळतरी जेवण करावे
भ्रमंती करण्यासाठी तंदुरुस्त राहावे लागते. त्यासाठी जेवण करणे आवश्यक आहे. परंतु, जेवणासाठी ठिकठिकाणी रेस्टाँरंटची, हॉटेल्सचा शोध घेणे अवघड काम असते. जर प्रत्येक वेळी जेवण करणे जमत नसेल, तर दिवसातून कमीत कमी एक वेळ तरी जेवण करावे. त्यामुळे प्रवासादरम्यान चक्कर येणे, अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.