दहशतवाद : काश्मिरात मानवतेची हत्या… | पुढारी

दहशतवाद : काश्मिरात मानवतेची हत्या...

सुनील डोळे

कधी काळी भूतलावरील नंदनवन अशी ख्याती प्राप्‍त केलेली काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्‍ताने लाल होऊ लागली आहे. संबंधितांची ओळखपत्रे पाहून या हत्या केल्या जात आहेत. स्थलांतरितांचे हत्याकांड, त्यामागील कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावले उचलली पाहिजेत. दहशतवाद मुक्‍त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.

दहशतवादाच्या वरवंट्याखाली पिचून गेलेल्या काश्मीरमध्ये पुन्हा बर्फ धुमसू लागला आहे. यावेळी दहशतवादाचा एक वेगळाच प्रकार तिथे पाहायला मिळतो आहे. त्याला परप्रांतीय विरुद्ध भूमिपुत्र असे परिमाण दिले जात आहे. म्हणजेच रोजीरोटीसाठी अन्य राज्यांतून काश्मीर खोर्‍यात आलेल्या मंडळींना लक्ष्य करण्याचे तंत्र दहशतवाद्यांनी यावेळी अवलंबले आहे. असे प्रकार यापूर्वीदेखील झाले आहेत. मात्र, यावेळी त्याची धग वेगाने वाढत चालली असून, त्यामुळे परप्रांतीयांचा भीतीने थरकाप उडाला आहे. या महिन्यात आतापर्यंत दहशतवाद्यांनी 11 बिगर काश्मिरी लोकांची हत्या केली असून, त्यामध्ये दोन शिक्षक आणि प्रामुख्याने गरीब मजुरांचा भरणा आहे. साहजिकच, आपला जीव वाचवण्यासाठी जम्मू रेल्व स्थानकावर आपापल्या राज्यांत परतणार्‍या मजुरांची अफाट गर्दी उसळली आहे.

कधी काळी भूतलावरील नंदनवन अशी ख्याती प्राप्‍त केलेली ही भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्‍ताने लाल होऊ लागली आहे. संबंधितांची ओळखपत्रे पाहून या हत्या केल्या जात आहेत. बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या राजा ऋषीदेव आणि योगेंद्र ऋषीदेव या दोघा मजुरांना त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी ठार केले, तर चुनचुन ऋषीदेव नावाचा मजूर या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. मी उपाशी मरेन; पण यापुढे कधीच काश्मीर खोर्‍यात येणार नाही, असे त्याने म्हटले आहे. ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हटली पाहिजे.

हे हल्ले कोण घडवून आणतेय याचाही सुगावा आता सुरक्षा दलांना लागला आहे. बहुचर्चित 370 कलम बरखास्त करण्यात आल्यापासून ‘द रेझिस्टंट फ्रंट’ (टीआरएफ) हा नवा गट काश्मीर खोर्‍यात सक्रिय झाला आहे. यापूर्वी सामान्य जनतेवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी याच गटाने घेतली होती. आता या गटाची नांगी ठेचणे हे सुरक्षा दलांसमोरील मोठे आव्हान आहे. याविषयी काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांचे म्हणणे असे की, सशस्त्र दलांनी केलेल्या धडाकेबाज कारवायांमुळे मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेले.

त्यामुळे त्यांच्यात वैफल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवाद्यांनी निःशस्त्र पोलिस, राजकारणी, महिला, अल्पसंख्याक आणि प्रामुख्याने परराज्यांतून आलेल्या मंडळींवर हल्ले करायला सुरुवात केली. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हे सगळे हल्ले पिस्तूलने केेले गेले आहेत. म्हणजेच नव्याने दहशतवादी झालेल्या किंवा त्यांच्या संघटनेत एखादे पद मिळालेल्या व्यक्‍तींनी हे हल्ले केले आहेत.

यासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे पाटण्यातील संचालक पुष्पेंद्र सांगतात की, या हल्ल्यांमागेही एक विशिष्ट कारण आहे. ते म्हणजे जर स्थानिकांची हत्या केली, तर ती बातमी तिथल्या माध्यमांपुरतीच मर्यादित राहते. मात्र, जर तुम्ही परराज्यांतील व्यक्‍तीला ठार केलेत, तर ती बातमी राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही विविध तपशिलांसह चर्चिली जाते. श्रीनगरमधील ईदगाह भागात पाणीपुरी विकणार्‍या अरविंद सहा यांना 16 ऑक्टोबर रोजी कट्टरतावाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे, गेली 17 वर्षे ते हे काम करत होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी कुलगाममध्ये बिहारच्या दोघा मजुरांना ठार करण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीपासून काश्मीर खोर्‍यात हे हत्यांचे सत्र चालूच आहे.

5 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हातात पिस्तूल घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी बिंदरू हेल्थ झोनचे मालक माखनलाल बिंदरू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. मग श्रीनगरमधील बाहरी संगम या ठिकाणच्या सरकारी शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी प्रत्येकाची ओळख विचारली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुपिंदर कौर व शिक्षक दीप चंद यांना ठार केले. आकडेवारीच द्यायची, तर चालू वर्षात आतापर्यंत काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांनी 28 सामान्य नागरिकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परराज्यांतून काश्मीर खोर्‍यात चरितार्थासाठी आलेल्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

तालिबानचा प्रवेश

या पार्श्‍वभूमीवर, काश्मीरचा तिढा आणखी जटिल बनत चालल्याचे दिसून येते. ‘इस रात की सुबह नहीं’ अशीच जणू तिथली परिस्थिती बनली आहे. यातून मार्ग कसा काढायचा, हा सध्याचा यक्षप्रश्‍न होय. अर्थात, या समस्येला अनेकविध पदर असून, ते आधी समजावून घेतले पाहिजेत. जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देणारे कलम 370 केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रद्दबातल केले. त्याचे जोरदार स्वागतही झाले. त्यानंतर काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर येईल, असा प्रबळ आशावाद व्यक्‍त करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या स्थानिकांसोबत दिवाळी सण साजरा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मिरी जनतेने मूळ प्रवाहात सामील व्हावे यासाठी अथक प्रयत्न केले. त्याला हळूहळू फळे येऊ लागली आहेत, असे वाटत असतानाच तिकडे अफगाणिस्तानात सत्तांतर झाले. कट्टरपंथी तालिबानने संपूर्ण अफगाण प्रदेशावर कब्जा केला आणि लगोलग काश्मिरात त्याचे थेट पडसाद उमटू लागल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे.

कारण, काश्मीरमधील मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला असल्याचा दावा तालिबानचा प्रवक्‍ता सुहैल शाहीन याने केला आहे. म्हणजेच आता तालिबानची पावले कोणत्या दिशेने पडणार आहेत किंवा पडू शकतात हे जाणून घेण्यासाठी तालिबानी प्रवक्त्याची मुक्‍ताफळे पुरेशी आहेत. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, यापूर्वीदेखील काश्मिरात दहशतवाद्यांनी अनेक निरपराध मजुरांच्या हत्या केल्या आहेत. अशीच एक घटना 2019 च्या ऑक्टोबरमध्ये घडली होती. तेव्हा राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोर्‍यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय महासंघाच्या संसदपटूंचे शिष्टमंडळ तिथे दाखल झाले होते.

तोच मुहूर्त साधत कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात पश्‍चिम बंगालचे पाच मजूर मृत्युमुखी पडले होते. ते सर्वजण मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी परराज्यांतून काश्मिरात येणार्‍या काही ट्रकचालकांनाही लक्ष्य केले होते. म्हणजेच काश्मीर खोर्‍यात दीर्घकाळापासून दहशतवाद्यांचा हा नंगानाच सुरू आहे. यालाच आता ‘टार्गेट किलिंग’ असे संबोधले जात आहे. यात काश्मीर खोर्‍यातील अल्पसंख्याकांनाही वेचून ठार मारण्यात येत आहे.

रेकी करून मगच हत्या

सुरक्षा दलांनी केलेल्या तपासात हे सिद्ध होत चालले आहे की, या हत्याकांडाचा कट रचण्यापूर्वी दहशतवादी संबंधित जागेची पूर्ण पाहणी (रेकी) करून मगच पुढील पावले उचलत आहेत. खोर्‍यातील विविध दहशतवादी संघटनांनी आता सामान्य जनतेला निशाणा बनवण्याचा जुनाच प्रकार नव्याने सुरू केला आहे. कारण, शस्त्रसज्ज सुरक्षा दलांशी दोन हात करण्यापेक्षा निःशस्त्र जनतेलाच लक्ष्य करणे तुलनेने अधिक सोपे आणि सुलभ आहे, असे या दहशतवादी संघटनांना वाटते. मुख्य म्हणजे त्यासाठी शक्‍तिशाली शस्त्रांची गरजच भासत नाही.

श्रीनगरमधील शाळेवर झालेला हल्ला आणि माखनलाल बिंदरू यांची हत्या रेेकी करूनच करण्यात आली होती, असे सुरक्षा दलांच्या तपासात उघड झाले आहे. तसे पाहिले तर बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि अन्य काही राज्यांतील मजूर आपले पोट भरण्यासाठी काश्मीर खोर्‍यात मोठ्या संख्येने येतात. मात्र आता ‘टार्गेट किलिंग’च्या भयंकर घटनांमुळे त्यांच्या पोटातही भीताचा गोळा उठला आहे.

खरे तर दिवाळी आणि छट पूजेसाठी हे मजूर आपापल्या गावांकडे जातच असतात. तथापि, आता मजुरांचे हे तांडे आपल्या नियोजित वेळापत्रकाच्या आधीच गावाकडची वाट चालू लागले आहेत आणि दहशतवादी संघटनांना नेमके असेच झालेले हवे आहे. मात्र, या घटनांमुळे जे मजूर अजूनही काश्मीर खोर्‍यात थांबले आहेत त्यांना प्रत्येक रात्र भीतीच्या छायेत काढावी लागत आहे. ही परिस्थिती सुरळीत करायची असेल तर त्यासाठी अल्पसंख्य आणि स्थलांतरितांच्या मनातील भीती सर्वप्रथम काढून टाकली पाहिजे. या मंडळींना आपण असुरक्षित आहोत, असे अजिबात वाटता कामा नये.

इट का जवाब पत्थरसे…

दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा द‍ृढनिश्‍चय सुरक्षा दलांनी केलेला असतानाच काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्यांना खणखणीत इशारा दिला आहे. निरपराधांच्या रक्‍ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला आम्ही घेऊ, अशा शब्दांत सिन्हा यांनी कट्टरतावाद्यांना सुनावले आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचा फास आवळत आणला आहे.

मात्र, दहशतवाद्यांच्या या नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या कारवायांमुळे काश्मीर सरकार आणि अर्थातच केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कारण, या सगळ्याच्या मुळाशी पाकिस्तान असल्याचे लपून राहिलेले नाही. तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेत पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) या पाताळयंत्री लष्करी गुप्‍तहेर संघटनेने कशी मदत केली, हेही पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या उपकारांची फेड तालिबानकडून केली जाईल हे तर उघडच आहे.

तालिबानने तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले आहे. म्हणूनच आपल्या देशापुढे पाकिस्तान आणि तालिबान असे दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. यातील आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, चीनने तालिबानी राजवटीला तातडीने दिलेली मान्यता. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ याच न्यायाने या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. चीनला तालिबानबद्दल आलेले उमाळेदेखील समजावून घेतले पाहिजेत. हे सगळे चित्र पाहिले, तर काश्मीर खोर्‍यातील आव्हानाची व्याप्‍ती सहज लक्षात येऊ शकते.

कितीही प्रयत्न केले तरी जम्मू-काश्मीर आपल्या ताब्यात येणे हे दिवास्वप्न असल्याचे पाकिस्तानला केव्हाच कळून चुकले आहे. त्यामुळेच हा टापू सातत्याने कसा अशांत राहील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याद्वारे कशी वळवळ करता येईल, असेच पाकिस्तानचे मनसुबे आहेत. परराज्यांतून काश्मीर खोर्‍यात आलेल्या स्थलांतरितांचे हत्याकांड ही म्हणूनच नेहमीसारखी घटना नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचे पदर, पैलू आणि कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावले उचलली पाहिजेत. दहशतवादमुक्‍त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.

Back to top button