सन्मान : प्राजक्त सुमन | पुढारी

सन्मान : प्राजक्त सुमन

नितीन सप्रे

सुमन कल्याmणपूर यांचा आवाज नुसताच गोड नाही, तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. गाताना त्या इतक्या तन्मय होतात की, त्यांना शब्दस्वरावलीव्यतिरिक्त इतर कशाचं भान उरत नसावं. म्हणूनच त्यांची, विशेषतः मराठी भावगीतं, भक्तिगीतं अजोड परिणामकारक झाली आहेत. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच ‘पद्मभूषणा’वह आहे.

एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांचे बीज रुजत नाही. सृष्टीचा नियमच आहे. मात्र, प्रत्येक नियमाला अपवाद हा असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अशाच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा यासारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणार्‍या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही; तर बहरून आलं. आता तर ‘पद्मभूषण’रूपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणार्‍यांनाही हा सुमनहार गळ्यात मिरवायला हरकत नसावी.

संबंधित बातम्या

सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. अस्सलशी साधर्म्य हे कमअस्सल कलाकारासाठी तर वरदान ठरू शकतं. मात्र, तेवढ्याच ताकदीच्या दुसर्‍या एखाद्या अव्वल कलाकारासाठी ते अस्मितेच्या संकटासारखं घातक ठरतं. सुमनताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या उगवतीच्या समयी लतारूपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेचं चीज करण्यास मायानगरी तोकडी पडली. हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘चाँद’ या चित्रपटासाठी शैलेंद्र यांच्या लेखणीतून झरलेलं ‘कभी आज, कभी कल, कभी परसो ऐसे ही बीते बरसों’ हे समदर्शी सुमनलतेचं एकमेव युगुल गीत ऐकताना या एक‘सूर’त्वाची प्रचिती येते. हे नृत्यगीत हेलन आणि शीला वाज यांच्यावर चित्रित झालं आहे. कुणी कुणाला आवाज दिला, हे ओळखणे निव्वळ अशक्य आहे किंवा आता फक्त सुमनताईंनाच शक्य आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना दुसर्‍या वर्षी त्यांना टरपेंटाईनची अ‍ॅलर्जी असल्याचं लक्षात आलं. त्याच सुमारास 1954 साली पार्श्वगायनाची संधीही चालून आली. ‘मंगू’ या चित्रपटातल्या ‘कोई पुकारे धीरे से आए’ या गीतानं त्यांच्या संगीत कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. आजतागायत रसिकांचा त्यांच्या गाण्यांसाठी पुकारा सुरू आहे. रेखाचित्राचं स्वरचित्रात झालेलं हे रूपांतरण संगीताच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरलं.

सुमन कल्याणपूर या पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी. सीता-शंकरराव हेमाडी हे त्यांचे माता-पिता. मंगलोरच्या हेम्माडी इथलं हे सारस्वत ब्राह्मण कुटुंब. सेंट्रल बँकेत उच्च पदावर असणार्‍या शंकरराव यांची ढाका इथे बदली होण्यापूर्वी 1937 साली 28 जानेवारीला तत्कालीन कलकत्ता इथे सुमनताईंचा जन्म झाला. पुढे ढाका इथे काही काळ राहिल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईत बदली करून घेतली. लग्नानंतर व्यवसायी पती रामानंद यांनी घरगुती कामात वाटा उचलून पत्नी सुमनला गायन व्यासंग सुरू ठेवण्यास सक्रिय प्रोत्साहन दिलं.

केशवा माधवाच्या नामातल्या गोडव्या इतका गोडवा सुमनताईंच्या गाण्यांतून अनुभवायला मिळतो. परमेश्वरानं जणू नीरक्षीर विवेकानं मधुमक्षिकेचा स्वर वगळून मधुरस तेवढा त्यांच्या कंठात, व्यक्तित्त्वात भरून दिला. ‘शब्द शब्द जपून’ ऐकत, कानी पडणार्‍या त्यांच्या स्वरांनी श्रुती धन्य होतात. गीत समोर आलं की, त्यात ओतप्रोत भाव मिसळून, शब्दार्थ, भावार्थ नीट समजून ते कसं सर्वांगसुंदर होईल याकडेच त्यांचा कटाक्ष असे. विशेषतः, त्यांच्या मराठी भावगीतं, भक्तिगीतांतून पदोपदी याची अनुभूती येते.

सुमन कल्याणपूर यांची सांगीतिक कारकीर्द मुख्यत्वे तिरंगी आहे. एक तर हिंदी पार्श्वगायन, नंतर मराठी वगळता अन्य भाषांतील पार्श्वगायन आणि सुगम संगीत आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे, मराठी पार्श्वगायन आणि सुगम संगीत. हिंदी पार्श्वगायन हे त्यांच्याकडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही काम न मागता विनासायास चालत आलं; मात्र ते राजकारणानं ग्रासलं गेलं. अर्थात, तरीही ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जूबान पर’, ‘मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘गरजत बरसत सावन आयो रे’, ‘ठेहरिये होष मे आऊ तो चले जाइयेगा’, ‘न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने’, ‘अजहुं न आए बलमा’, ‘बाद मुद्दत के ये घड़ी आई’, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’, ‘इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार’, ‘ये दुनिया के बदलते रिश्ते’, ‘जिंदगी इम्तिहान लेती है’ यासारख्या असंख्य अक्षर गीतांचा ठेवा रसिकांना सुपूर्द करताना ‘रहे ना रहे हम मेहेका करेंगे’ असा दिलासा देऊ करत 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी निरोप दिला.

बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, असमिया, मैथिली, राजस्थानी, ओडिया अशा अन्य भाषांतही त्यांनी गायिलेली किती तरी गीतं गाजली. मराठी प्रांतात भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतांच्या रूपानं त्यांनी अपार स्वर दौलत उधळली आहे. ‘पहिलीच भेट झाली’, ‘असावे घर ते अपुले छान’, ‘आला गं सुगंध मातीचा’, ‘एकदाच यावे सखया तुझे गीत कानी’, ‘वार्‍यावरती घेतं लकेरी’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘झिमझिम झरती श्रावण धारा’, ‘दिन रात तुला मी किती स्मरू’, ‘नकळत सारे घडले’, ‘पिवळी पिवळी हळद’, ‘रे क्षणांच्या संगतीने’, ‘विसरशील तू सारे’ यासारखी अभिजात भावगीतं, ‘देवगृही या भक्त जनांना गौरी नंदन पावला’, ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘एक एक विरतो तारा’, ‘कृष्ण गाथा एक गाणे’, ‘मधुवंतीच्या सुरा सुरातून’, ‘मृदुल करांनी छेडीत तारा’, ‘हरी भजनी रंगली राधिका’, ‘ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते’, ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’ ही निवडक भक्तिगीतं तसेच ‘दीपका मांडीले तुला सोनियाचे ताट’, ‘या लाडक्या मुलांनो’ ही गीतं किंवा ‘एक एक पाऊल उचली चाल निश्चयाने’, ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’, ‘अरे संसार संसार’, ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘गेला सोडूनी मजसी कान्हा’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘कशी करू स्वागता’, ‘बघत राहू दे तुझ्याकडे’, ‘आनंद मनी माईना’, ‘आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही’, ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव’ या काही चित्रगीतांच्या आठवणीही काना-मनाला भारावलेपणाची अनुभूती देतात. सुमनताईंचा आवाज नुसताच गोड नाही, तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. अर्जुनाला जसा माशाचा फक्त डोळाच दिसत होता. त्याप्रमाणेच, गाताना त्या इतक्या तन्मय होतात की, त्यांना शब्दस्वरावलीव्यतिरिक्त इतर कशाचं भान उरत नसावं. म्हणूनच त्यांची, विशेषतः मराठी भावगीतं, भक्तिगीतं अजोड परिणामकारक झाली आहेत. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच ‘पद्मभूषणा’वह आहे.

 

Back to top button