विकास : आनंददायी प्रवासाचा मेट्रो मार्ग | पुढारी

विकास : आनंददायी प्रवासाचा मेट्रो मार्ग

मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडित सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प येऊ घातले आहेत. यात मुंबईला आडव्या-तिडव्या छेदणा़र्‍या तब्बल 337 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, उद्वाहन, सरकते जिने आदी सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?

आठ-दहा वर्षांपूर्वी ‘जागतिक आनंद दिनी’ प्रथमच ‘आनंदाचा निर्देशांक’ (यूनो वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’) प्रसिद्ध झाला तेव्हा त्याविषयी उत्सुकता होती. सर्वात ‘आनंदी देश’ कोणता, हे ठरविताना नोकरी-व्यवसायाच्या संधी, शिक्षण, निवास, कायदा-सुव्यवस्था, व्यवस्थेतला लाचखोरपणा, संपर्कसाधने आदी घटकांसोबतच देशातील दळणवळण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही विचार या अहवालात केला जातो. यात घर ते कार्यालय अशा कराव्या लागणार्‍या दैनंदिन प्रवासाचा विचार केला तर आपण शेवटून पहिले ठरू, असे त्यावेळी सामान्य मुंबईकर म्हणून वाटले होते. दररोज रेल्वे, बेस्ट, टॅक्सी-रिक्षाने प्रवास करताना गर्दी, वाहतूक कोंडी, वेळ-सुरक्षेबाबतची अनिश्चितता अशा कित्येक अडचणींचा सामना मुंबईकरांना करावा लागतो.

पावसाळ्यात तर या हालांना पारावार राहत नाही. ही दमवणूक दिवसभराचा उंचावलेला ‘आनंदाचा निर्देशांक’ झटक्यात खाली आणणारी न ठरेल तरच नवल. मुंबईसारख्या वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असलेल्या आर्थिक महानगरीची ही अवस्था तर इतर शहरांचे काय? भारत त्यावेळी पहिल्या शंभरात नव्हता, हे नव्याने सांगायला नको. थोडक्यात विकसित देशांमध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाचा, आनंदाचा (भावनिक विश्वाचा) विचार करताना कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेला अर्थकारण, शिक्षण, निवारा, व्यापार-उद्योगधंद्यांच्या बरोबरीने स्थान दिले गेले आहे.

मुंबईकरांची मानसिकता आणि वाहतुकीचा बोजवारा

भारतात तर शहरागणिक वाहतुकीची व्यवस्था बदलते. उदाहरणार्थ पुणेकरांचे त्यांच्या दुचाकीशिवाय पान हलत नाही. तर मुंबईची ओळख लोकल, बेस्ट, काळी-पिवळी टॅक्सीशिवाय पूर्ण होत नाही. मुंबईसारखे उपनगरीय रेल्वेचे जाळे देशात कुठेही पाहायला मिळत नाही. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुंबईत रुळण्यास शहराची भूशास्त्रीय रचना, वातावरण यांबरोबरच इथली विशिष्ट आर्थिक, राजकीय परिस्थिती, रहिवाशांची सामूहिक मानसिकता आदी घटक कारणीभूत ठरले. मुंबईकरांच्या बाबतीत ही मानसिकता दोन प्रकारची. एक पावसाळ्यात पूर, दहशतवादी कारवाया, हल्ले होत असतानाही पुन्हा उभे राहण्याची ‘मुंबई स्पिरीट’वाली मानसिकता. तर दुसरी कमालीच्या सहनशीलतेची. अन्यथा जीवघेण्या गर्दीचा सामना करत शहराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला दररोज दीड ते चार तासांचा प्रवास, तोही वर्षानुवर्षे करत राहणे त्याला कधीच शक्य झाले नसते!

आतापर्यंत मुंबईच्या आर्थिक जडणघडणीच्या काळात दळणवळणाचा मोठा भार रेल्वे – बेस्टने पेलला. दररोज साधारण 70 ते 80 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. हा प्रवास 105 (कसारा ते सीएसएमटी) ते 40 (बोरिवली ते चर्चगेट) किलोमीटर असा कितीही असू शकतो. तसेच तो उत्तरेकडून दक्षिण मुंबईकडे असा सरळरेषीय असेल असेही नाही. मुंबई शहरात, उपनगरात आणि मुख्य म्हणजे वेशीवर येऊ घातलेल्या हजारो गृहप्रकल्पांमुळे हा प्रवास मुंबई, शहर-उपनगरे, ठाणे, नवी मुंबई, पालघर असा अनेक जिल्ह्यांना छेद देत लघुकोन, काटकोन, विशालकोनासोबत त्रिकोणाची किमया साधू लागला आहे. रेल्वे, बेस्ट, एसटीसोबतच अपवर चालणारी प्रवासी वाहतूक सेवा, कार-बस पुलिंग असे नानाविध प्रकारांची भर त्यात पडू लागली आहे. घर ते कार्यालय असा हा प्रवास गुंतागुंतीचे समीकरण बनू लागल्याने मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा पार बोजवारा उडालेला दिसून येतो.

मेट्रोच का?

शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर उपाय म्हणून सरकारने मेट्रो-मोनोरेल आणली. त्यापैकी मोनोला प्रवाशांकडून प्रतिसाद नसल्याने ती पांढरा हत्ती ठरली असली तरी ‘मेट्रो 1’ने मुंबईकरांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो याची चुणूक दाखवून दिली. चार ते साडेचार लाख प्रतिदिन प्रवासी संख्या असलेली संपूर्ण क्षमतेने चालविली जाणारी ही देशातील एकमेव मेट्रो! आठ वर्षांच्या इतिहासात तांत्रिक अडचणींमुळे बंद राहण्याची वेळ ‘मेट्रो 1’वर क्वचितच आली. ‘मेट्रो 1’पासून सुरू झालेले हे जाळे दक्षिण मुंबईच नव्हे तर पश्चिमेला मीरा-भाईंदर तर पूर्वेला कल्याण-भिवंडीपर्यंत तब्बल 337 किलोमीटरच्या मार्गिका बांधून विस्तारण्यात येणार आहे. यासोबतच मुंबईत कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जेव्हीएलआर, एससीएलआर, ईस्टर्न फ्री वे असे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. परंतु, मेट्रो ही उपनगरीय रेल्वे खालोखाल (उपनगरीय रेल्वे सुमारे 427 किलोमीटरची) मार्गिकांचे जाळे असलेली दुसरी मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरेल. या 9 ते 10 मेट्रो मार्गिकांचा मुंबईकरांच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवर आणि एकूणच शहराच्या आर्थिक-भावनिक जडणघडणीवर कसा परिणाम होईल, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

मेट्रोच्या 337 पैकी सुमारे 200 किलोमीटर मार्गिकांचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यातील पश्चिम रेल्वेला दोन्ही बाजूंनी समांतर जाणार्‍या ‘मेट्रो 7’ आणि ‘मेट्रो 2 ए’ या मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत आल्या आहेत. परस्परांना पूरक ठरल्याने या तिन्ही मार्गांवरील प्रवासी संख्या 15 हजाराने वाढली आहे. या तिन्ही मार्गांवर सध्या सुमारे चाळीस एक गाड्या चालविल्या जात आहेत. 2031 पर्यंत मार्गावरील प्रवासी संख्या 6 लाखांच्या आसपास जाईल, असा अंदाज आहे. उर्वरित मार्गिकांपैकी ‘मेट्रो 3’चे काम प्रगतीपथावर असून दोन वर्षात तीही सेवेत येईल. इतर मार्गिकांचे काम रामभरोसेच म्हणायला हवे.

मुंबईला उभ्या-आडव्या छेदणार्‍या मेट्रो

मेट्रोचे सर्व मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) आहेत. अपवाद फक्त राजकीय हेव्यादाव्यात सापडल्याने रखडलेल्या ‘मेट्रो 3’चा. विमानतळ, अनेक महत्त्वाची रेल्वे स्थानके (सीएसटी-चर्चगेटसह), नरिमन पॉईंट, सीप्झ, ‘एमआयडीसी’तील व्यावसायिक संकुले, बीकेसी, काळबादेवी, वरळी, दादर-प्रभादेवी, अंधेरी पूर्व यांना जोडत मुंबईच्या पोटातून जाणारी ही एकमेव भुयारी मेट्रो या सगळ्यात ‘गेमचेंजर’ ठरेल.

‘मेट्रो 1’ हा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्ग सीप्झ, ‘एमआयडीसी’ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना जोडतो. तर दहिसर (प) -डी. एन. नगर आणि दहिसर (पू) – अंधेरी (पू) या अनुक्रमे ‘मेट्रो 2ए’ आणि ‘मेट्रो 7’ या मार्गांमुळे सर्वाधिक वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्ग आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली आहे. या पाठोपाठ येणार्‍या वडाळा-ठाणे-कासारवडवली (मेट्रो 4) या मेट्रोमुळे ठाणे-घोडबंदर परिसरात उभ्या राहणार्‍या निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांचा प्रवास सुखकारक ठरेल. ही मेट्रो एका बाजूला कासारवडवली-वडाळा (हिचे काम सुरू आहे.) आणि दुसर्‍या बाजूला ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो 5) अशी विस्तारली जाणार असल्याने ठाण्यापलीकडे राहणार्‍या उपनगरवासीयांचाही शहराकडचा प्रवास आरामदायी बनेल, अशी अपेक्षा आहे. या शिवाय ‘मेट्रो 6’, ‘मेट्रो 2 बी’, ‘मेट्रो 9’ अशा मुंबईला उभा-आडवा-तिरका छेद देत वेगवेगळ्या दिशांना जोडणार्‍या मार्गिकांमुळे सार्वजनिक वाहतुकीचा रेल्वे-बेस्टच्या खांद्यावरील बराच मोठा भार दूर होणार नसला तरी हलका नक्कीच होईल.

हे स्वागतार्ह

मेट्रो उपनगरीय रेल्वे, एसटी यांना शक्य तिथे जोडली जात आहे. मोनो रेल सध्या जरी फायद्यात नसली तरी भविष्यात तिला मेट्रोने जोडल्यास तीही कार्यक्षमतेने चालविता येईल. मोनोरेल ‘मेट्रो3’शी जोडण्याची योजना असल्याचे ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) जाहीर केले आहेच. केवळ मोनोच नव्हे तर वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकाही एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्याचे फायदे ‘मेट्रो 1’शी ‘मेट्रो 7’ आणि ‘मेट्रो 2ए’ जोडली गेल्याने दिसून आले. या मेट्रो जिथे जोडल्या जातात तो मार्ग सामान्य प्रवाशांप्रमाणे गरोदर, आबालवृद्धांकरिता पुरेसा सुरक्षित, सहजसोपा आणि रुंंद-मोकळा असावा.

मेट्रोकरिता एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित झाली आहे. भविष्यात रेल्वे, बेस्टशीही ती जोडली जाणार आहे. जिथे शक्य होईल तिथे मेट्रो रेल्वेशीच नव्हे तर विमानतळ, व्यापारी संकुले-आस्थापने-मॉल यांनाही जोडण्यात येणार आहे. येत्या काळात मोठ्या गृह संकुलांना जोडण्याची योजना आहे. यामुळे मेट्रोचा विस्तार होण्यास मदत होईल. मेट्रोमुळे हे फायदे हेरून अंधेरी, वर्सोवा, लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग या ठिकाणच्या विकासकांनी मेट्रो स्थानकांना लागून असलेल्या गृह प्रकल्पांचा भाव आतापासूनच वधारून ठेवला आहे. त्यामुळे या भागातील जागांच्या किमती पुन्हा एकदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत

मेट्रो यशस्वी होण्यात ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’चा (मेट्रो प्रवासानंतर घर-कार्यालयापर्यंत सहजपणे उपलब्ध असलेली बेस्ट-रिक्षा-टॅक्सी इत्यादी सेवा. यात पदपथही आले) मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने मुंबईत त्यासाठीचा पाया आधीच विस्तारलेला आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील ‘मेट्रो 1’च्या यशस्वितेतेच्या मागे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ हे कारण दिले जाते. नव्याने सुरू होणार्‍या मेट्रो मार्गिकांना जोडून बेस्ट सेवा, रिक्षा-टॅक्सीकरिता शिस्त-नियोजनबद्ध तळ आणि ज्यांना पुढील प्रवास पायी करायचा आहे, त्यांच्याकरिता चांगले पदपथ ही व्यवस्था या मेट्रो मार्गिकांना पूरक ठरते. त्यामुळे मेट्रोचे नियोजन करताना याचाही विचार व्हायला हवा. या शिवाय ई-बाईक, सायकली अशा सुविधा पुरविण्यावर ‘एमएमआरडीए’चा भर आहेच.

बदलती मानसिकता

पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल आली तेव्हा तिला कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न रेल्वे, प्रसारमाध्यमे, राजकारणी असा सगळ्यांनाच पडला होता. परंतु, काही ठरावीक वेळेत या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. म्हणूनच या गाड्यांविरोधात होणार्‍या आंदोलनाबाबत राजकारण्यांमध्ये ‘धरले तर चावते…’चे वातावरण आहे. ज्या प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलची मागणी होत आहे, तोच उद्याचा मेट्रोचा प्रवासी आहे. रेल्वेची गर्दी टाळण्याकरिता हा वर्ग नाईलाजाने कार पुलिंग, कॅबसारख्या वाहतुक कोंडीच्या तोंडी देणार्‍या सेवा सध्या निवडत आहे. सुरक्षित व आरामदायी प्रवासाकरिता वेळ पडली तर अधिकचे पैसे मोजण्यास तयार असलेल्या या प्रवाशांचा मोठा वर्ग मेट्रोने प्रवास करण्यास उत्सुक आहे.

प्रवाशांच्या या अपेक्षांचा भार भविष्यात स्वच्छ, कार्यक्षम, सुरक्षित आणि वेगवान प्रवासाची हमी देऊन मेट्रोला पेलायचा आहे. हे करताना ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, याचे भान ठेवावे लागेल. त्यात मेट्रोचे सर्वच मार्ग ‘मेट्रो 1’प्रमाणे पूर्ण क्षमतेने आणि फायद्यात चालविणे शक्य होईल असे नाही. काही मार्गांना जेमतेम प्रतिसाद लाभू शकतो. परंतु मेट्रोच्याच नव्हे तर मुंबई महानगर प्रदेशाच्या एकात्मिक वाहतूक विकासाकरिता तोट्यात चालणारे हे मार्गही टिकवावे लागतील. तिथेही तितकीच स्वच्छता, सुरक्षितता, सुविधा, कार्यक्षमता द्यावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे ‘मेट्रो 1’ नंतर पुढील दोन मार्गिका सेवेत येण्याकरिता मुंबईकरांना दहा वर्षे वाट पाहावी लागली.

हा विलंब अन्य मार्गिकांबाबत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मुंबई महानगर प्रदेशाच्या एकात्मिक विकासात रेल्वे, बेस्ट, एसटी आदी परंपरागत वाहतूक व्यवस्थांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी मेट्रो, रेल्वे, बेस्ट, एसटी यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी परस्परपूरक सेवा देऊन, सर्व सेवा कार्यक्षमतेने चालविण्याचा द़ृष्टिकोन बाळगायला हवा. बेस्टने मेट्रोमुळे होणार्‍या सुधारणांनुरूप आपली सेवा विस्तारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेकडूनही हे शहाणपण दाखविले जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात प्रवाशांची मानसिकता बदलते आहे. मुंबईकराच्या या भावनांशी बांधिलकी दाखविण्याचे भान सर्व यंत्रणांनी दाखविली तर मुंबईकरांच्या आनंदाचा आलेख उंचावण्यास नक्कीच मदत होईल!

प्रस्तावित मेट्रो मार्ग

* मेट्रो 2 – दहिसर-चारकोप-वांर्दे-मानखुर्द – पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिणेकडील उपनगरांना जोडणारा
* मेट्रो 2बी – डी.एन.नगर-मंडाले – हा मार्ग मेट्रो 1, मेट्रो, 2ए, मेट्रो 4 आणि मेट्रो3 शी जोडला जाणार आहे.
* मेट्रो 3 – कुलाबा-वांर्दे-सीप्झ (पूर्णपणे भुयारी)
* मेट्रो 4 – वडाळा-ठाणे-कासारवडवली
* मेट्रो 5 – ठाणे-भिवंडी-कल्याण – हा मार्ग मेट्रो4 (ठाणे-कासारवडवली) शी जोडणार.
* मेट्रो 6 – स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी – हा मार्ग जोगेश्वरी, पवई मार्गे पश्चिम-पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणार. (मेट्रो2ए, मेट्रो7, मेट्रो3 आणि मेट्रो 4शी जोडला जाणार)
* मेट्रो 9 – मेट्रो 7चाच विस्तारित मार्ग. दहिसर (पू) ते अंधेरी जाणारा हा मार्ग पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि उत्तरेला दहिसरहून मीरा-भाईंदरशी जोडला जाईल.
* मेट्रो 12 – कल्याण ते तळोजा.

रेश्मा शिवडेकर

Back to top button