Balochistan : पाकमध्ये चिनी लक्ष्य | पुढारी

Balochistan : पाकमध्ये चिनी लक्ष्य

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना व लष्कर दारुगोळ्यालाही महाग झाले असताना, बलुचीस्तानात (Balochistan) बंडखोरी वाढणे व त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केले जाणे, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवे पाकिस्तानी सरकार व लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

चीन आणि पाकिस्तान यांची हिमालयापेक्षा उंच आणि सागरापेक्षा खोल अशी मैत्री असली, तरी चीनसाठी पाकिस्तान ही एक नवी जोखीम ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकतर चीनला पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून (सीपेक) अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. उलट हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. दुसरे असे की, चीन हा पाकिस्तानला कर्जाच्या सापळ्यात अडकवत आहे, अशीही भावना पाकिस्तानातील काही कट्टरपंथीयांच्या मनात घर करू लागली आहे. चीनच्या झिंगझियांग प्रांतात उघीर मुस्लिम जनतेला जी वागणूक चीन सरकारकडून देण्यात येत आहे, त्याबद्दलही पाकिस्तानातील कट्टर इस्लामी संघटनांत नाराजी आहे.

त्यामुळे अलीकडच्या काळात पाकिस्तानात कामासाठी आलेल्या चिनी लोकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या हल्ल्यांत प्रामुख्याने बलोच बंडखोरांचा हात असल्याचे सकृतदर्शनी दिसत असले, तरी पाकिस्तानातील तालिबानची शाखा तहरीक- ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचाही या हल्ल्यात हात असल्याचा संशय आहे. मुख्य म्हणजे अशा हल्ल्यांत पाकिस्तानी लष्करातील काही अधिकार्‍यांचा हात असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानातील चिनी नागरिकांवरील ताजा हल्ला गेल्या 26 एप्रिलला झाला, त्यात तीन चिनी नागरिक व एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला. हा हल्ला कराची विद्यापीठातील चीन अभ्यास केंद्रावर झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने स्वीकारली असून, हा हल्ला एका आत्मघाती बलोच महिलेमार्फत करण्यात आल्याचे घोषित केले आहे. चीन पाकिस्तानात जो इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवीत आहे, तो प्रामुख्याने बलुचीस्तान (Balochistan) प्रांतातून जातो व या प्रांतातले ग्वादार हे बंदर पाकिस्तानने चीनला दीर्घ भाडेकराराने दिले आहे.

या सर्व गोष्टींचा बलुची लोकांना काहीच फायदा होत नसून, उलट बलुचींचे चीन व पाकिस्तान मिळून शोषण करीत आहेत, असा बलोच लिबरेशन आर्मीचा दावा आहे. तसेही बलुची लोक स्वत:ला पाकिस्तानी मानत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात बलुचीस्तान हा स्वतंत्र प्रांत होता, जो नंतर लष्करी बळाने पाकिस्तानला जोडण्यात आला. तेव्हापासून बलुची पाकिस्तानपासून फुटून निघण्यासाठी लढत आहेत. पण बलुचीस्तानच्या या लढ्याला फारशी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नव्हती. (Balochistan)

पण गेल्या काही वर्षांत या लढ्याबाबत जागतिक समुदायात जागृती निर्माण झाली आहे. विशेषत: पाकिस्तानात पाय रोवून अमेरिका व भारताच्या हितसंबंधाला चीन धक्का पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही देशांनी बलुचीस्तानच्या मुक्ततेच्या लढ्याला मूक पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे बलुची बंडखोरांचे मनोधैर्य उंचावले असून, त्यांच्या कारवायांत वाढ झाली आहे. त्यांनी बलुचीस्तानातील पाकिस्तानी लष्करी तळांवर व चिनी आस्थापना व लोक यांच्यावरील हल्ले वाढवले आहेत.

बलुचीस्तान लिबरेशन आर्मीने गेल्या फेब्रुवारीत बलुचीस्तान प्रांतात पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या दोन केंद्रांवर जबरदस्त हल्ले केले. या हल्ल्यात नऊ सुरक्षा सैनिक ठार झाले, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले असले; तरी हा आकडा किमान 40 ते 100 असावा, असा अंदाज आहे. यावेळी 20 हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी ठार केल्याचा दावा पाक सरकारने केला, पण बलुचीस्तान लिबरेशन आर्मीने आपले 16 लोक ठार झाल्याचे मान्य केले आहे.

हे हल्ले बलुचीस्तान प्रांतातील पंजगूर आणि नोश्की या दोन ठिकाणच्या लष्करी केंद्रांवर झाले. हे हल्ले व्यवस्थित नियोजन करून करण्यात आले होते. हे हल्ले परतवून लावण्यास दोन दिवस लागले. या हल्ल्यात दोन्ही बाजूंचे आणि विशेषत: पाकिस्तानी लष्कराचे 400 सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. या हल्ल्यानंतर बलुची संघटनेने एक पत्रक काढून या हल्ल्याची सर्व उद्दिष्ट्ये साध्य झाल्याचे घोषित केले.

पाकिस्तान सरकारने नेहमीप्रमाणे या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. पण अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारताचा तेथील प्रभाव संपला असताना, या हल्ल्यासाठी भारताची मदत मिळणे अवघड आहे. उलट आता असे लक्षात येत आहे की, हा हल्ला बलुचीस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान-तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान या संघटनेच्या मदतीने केला असावा. खरे तर, या दोन्ही संघटनांचे पाकिस्तान सरकारशी वैर असले तरी त्याची कारणे परस्परविरोधी आहेत.

बलुची संघटनेला बलुचीस्तानचे स्वातंत्र्य हवे आहे. त्यांच्या या मागणीला भारताची सहानुभूती आहे. त्यामुळे या संघटनेला भारताकडून राजकीय, लष्करी पाठिंबा मिळतो, असा पाकचा आरोप आहे. पण या संघटनेला इराणमधील बलुचींकडूनही पाठिंबा मिळतो, हेही खरे आहे. पाकिस्तान आणि इराणची सीमा जवळपास एक हजार किलोमीटरची आहे व ती खुली आहे. त्यामुळे पाकिस्तानात हल्ले करून बलुची बंडखोर सहज इराणमध्ये आश्रय घेऊ शकतात. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात सख्य आहे, असे आतापर्यंत मानले जात होते. पण अलीकडेच या दोघांतले मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. (Balochistan)

गेल्या वर्षी जुलैमध्ये खैबर पख्तुनवा प्रांतातील अप्पर कोहिस्तान येथे, चीनच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या 4300 मेगावॅट क्षमतेच्या विद्युत केंद्रावर काम करीत असलेल्या चिनी अभियंत्यांची बस बॉम्बने उडवून देण्यात आली. त्यात 9 चिनी व 4 पाकिस्तानी ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नसली, तरी तो बलुचीस्तान लिबरेशन आर्मीनेच केला असावा, असा संशय आहे. पण यात पाकिस्तानी तालिबानचाही हात असण्याची शक्यता नाकारली जात नाही.

या सर्व हल्ल्यांनंतर चीन सरकारने या हल्ल्याच्या तपासासाठी चिनी तपास यंत्रणेला पाकिस्तानात येऊ द्यावे, अशी मागणी केली. पण त्यामुळे पाकिस्तानी जनतेत असंतोष निर्माण झाला असता हे ओळखून पाकिस्तान सरकारने त्यास नकार दिला. पण चीन सरकारचा या हल्ल्याच्या तपासासाठी व संबंधितांना शिक्षा करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम आहे.

बलुचीस्तानी बंडखोरी दिवसेंदिवस वाढतच जाण्याची चिन्हे असून, ती कशी संपवावी? हा पाक प्रशासनापुढे आता मोठा पेच आहे. लष्करी बळाने ही बंडखोरी चिरडण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिक चिघळण्याचा संभव आहे. चर्चेने हा प्रश्न सोडवायचा असेल, तर आता खूप उशीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचे स्वरूप पाहता, बंडखोर आता केवळ राजकीय अथवा आर्थिक स्वायत्तत्तेच्या आश्वासनांनी समाधानी होण्याची शक्यता कमी आहे. मुख्य म्हणजे बलुची बंडखोरांचा पाकिस्तानी लष्करावर विश्वास राहिलेला नाही. हे लष्कर आपल्याला चर्चेत गुंतवून ठेवून नंतर विश्वासघात करील, अशी रास्त भीती या बंडखोरांना वाटते आहे. (Balochistan)

त्यामुळे येत्या काळात बलुची बंडखोरांचे हल्ले सतत वाढत राहतील व त्यांना बाह्यमदत मिळत राहील, अशीच शक्यता जास्त दिसते. पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना व पाकिस्तानी लष्कर दारुगोळ्यालाही महाग झाले असताना, बलुचीस्तानात बंडखोरी वाढणे व त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केले जाणे, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवे पाकिस्तानी सरकार व लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

दिवाकर देशपांडे

Back to top button