कोरोना काळात नोकरी गेली ; बेरोजगार भत्त्याचा लाभ कसा घ्यावा ? | पुढारी

कोरोना काळात नोकरी गेली ; बेरोजगार भत्त्याचा लाभ कसा घ्यावा ?

एखादी व्यक्ती खासगी क्षेत्रात काम करत असेल आणि त्याच्या वेतनातून ईएसआयसीचा हप्ता काही प्रमाणात कपात होत असेल, तर ती व्यक्ती या योजेनला पात्र मानली जाईल. ईएसआयसीसाठीं त्याने किमान 78 दिवस अंशदान देणे गरजेचे आहे. अशी व्यक्ती बेरोजगार भत्ता मिळण्यास पात्र असेल.

केंद्र सरकारने अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेचा कालावधी 30 जून 2022 पर्यंत वाढवला आहे. कारण कोरोना काळात हजारो लोकांना नोकर्‍यांना मुकावे लागले आहे. परिणामी असंख्य नोकरदार लोकांवर, कुटुंबांवर आर्थिक कुर्‍हाड कोसळली. कामावरून कमी करणार्‍या कंपनीकडून फारसे आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती शोचनीय झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्‍या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचे निश्चित केले. या योजनेची जबाबदारी कर्मचारी राज्य विमा मंडळ म्हणजेच ईएसआयवर सोपवण्यात आली.

या योजनेनुसार कोव्हिड काळात एखाद्या कर्मचार्‍याची नोकरी गेली असेल, तर त्यास बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेनुसार कोरोना काळात बेरोजगार झालेल्या व्यक्तीला भत्ता दिला जातो. या भत्त्याचा लाभ हा कोणताही कर्मचारी तीन महिन्यांपर्यंत घेऊ शकतो. परंतु तीन महिन्यांत त्याने नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करणे अपेक्षित आहे. बेरोजगार भत्त्याच्या रूपातून कर्मचार्‍याला तीन महिन्यांची सरासरी वेतनाचा 50 टक्के हिस्सा दिला जातो. यासाठी कर्मचार्‍याला ईएसआयसीकडे दावा करणे गरजेचे आहे. नोकरी जाण्यास महिना उलटून गेला असेल आणि त्यास जुन्या ठिकाणी परत बोलावले नसेल किंवा नोकरी मिळाली नसेल, तर त्याला भत्ता मिळू शकतो.

या याजेनेच्या लाभासाठी कर्मचारी फक्त एकदाच दावा करू शकतो. दाव्यानंतर त्याला योजनेचा लाभ मिळाला तर तो दुसर्‍यांदा अर्ज करू शकत नाही. मग पुन्हा त्याची नोकरी कोणत्याही कारणाने गेली असेल तरीही तो दावा करू शकत नाही. योजनेसाठी दावा करताना संबंधित व्यक्ती बेरोजगार असणे गरजेचे आहे.

खासगी कंपन्या, कारखाना किंवा एखाद्या संस्थेत काम करणारा कर्मचारी असावा आणि कोव्हिड कारणांमुळे त्याने नोकरी गमावलेली असावी. यानुसार 21 हजारांपेक्षा कमी वेतन असणारा व्यक्ती या योजनेचा लाभार्थी असेल. अर्थात, दिव्यांगच्या बाबतीत उत्पन्नाची मर्यादा वेगळी आहे. सध्या 21 हजारांपेक्षा कमी वेतन असणार्‍या कर्मचार्‍यांना ईएसआयसीकडून कार्ड दिले जाते. या कार्डधारकाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

एखादी व्यक्ती खासगी क्षेत्रात काम करत असेल आणि त्याच्या वेतनातून ईएसआयसीचा हप्ता काही प्रमाणात कपात होत असेल, तर ती व्यक्ती या योजेनला पात्र मानली जाईल. ईएसआयसीसाठी त्याने किमान 78 दिवस अंशदान देणे गरजेचे आहे. अशी व्यक्ती बेरोजगार भत्ता मिळण्यास पात्र असेल. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या व्यक्तीला भत्ता हवा असेल, तर त्यास ईएसआयसीच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज द्यावा लागेल.

अर्जाबरोबरच त्याने कंपनीकडून कामावरून कमी केलेले पत्र जोडणे गरजेचे आहे. जर एखादी कंपनी पत्र न देताच कर्मचार्‍याला घरी पाठवत असेल, तर त्याची माहिती देखील ईएसआयला द्यावी लागेल. या आधारावर ईएसआयकडून संबंधित व्यक्तीची कंपनीत चौकशी केली जाईल. अर्जाची छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल आणि तशी माहिती पत्राद्वारे दिली जाईल. अर्ज फेटाळण्यामागचे कारणही सांगितले जाईल.

दाव्याचा फॉर्म हा ईएसआयसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तेथून तो डाऊनलोड करता येणे शक्य आहे. हा अर्ज भरून तो जवळच्या ईएसआयसीच्या शाखेत जमा करावा लागेल. याचबरोबर 20 रुपयांचा स्टॅम्पपेपर देऊन शपथपत्र द्यावे लागेल. यावर कंपनीचे नाव आणि काढून टाकण्याचे कारण सांगावे लागेल. एखाद्या कर्मचार्‍याला गैरवर्तनावरून काढले असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. यासंदर्भात ईएसआयकडून कंपनीकडे विचारणा होऊ शकते.

विधिषा देशपांडे

Back to top button