stock market : सावध ऐका पुढील हाका! | पुढारी

stock market : सावध ऐका पुढील हाका!

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यापासून दिवाळीची चाहूल लागल्यामुळे शेअर बाजार (stock market) उत्तरायणाचा अनुभव घेत आहे. याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समयोचित असा इशारा दिला आहे. आर्थिक वर्ष मार्च 2021 चे सर्व कंपन्यांचे अहवाल आता जाहीर झाले आहेत. अशावेळी आर्थिक रथांवर आरूढ झालेल्या रथी-महारथींच्या हातातला वेग वाढू शकतो. संस्कृतमध्ये वेग या शब्दाला लगाम असाही अर्थ आहे. आपल्या धुंदीत रथी हे जर विसरत असेल तर रथ हाकणार्‍या सारथ्याने लगाम (वेग) वाढणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. सारथ्याचे हे काम शक्तिकांत दास यांनी वेळेवरच केले आहे.

आर्थिक स्थैर्यसाठी हे भान संबंधितांना (अर्थमंत्री व केंद्र सरकार) यांना जरूर हवे ते भान राहावे यासाठी रिझर्व्ह बँक सदैव दक्ष आणि जागरुक असते. त्यासाठी शक्तिकांत दास यांनी नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ ऑडिट अँड अकाऊंटस्’ या संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना हा इशारा दिला आहे. श्री. शक्तिकांत दास हे केवळ अर्थतज्ज्ञ म्हणून गव्हर्नर, पदे म्हणून भूषवीत नसून ते केंद्रात एक उत्तम प्रशासक होते हे लक्षात घेतले की त्यांनी हा दिलेला इशारा डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.

लेखा परीक्षण म्हणजे ‘ऑडिट रिपोर्ट’ आर्थिक स्थैर्यासाठी किंवा विकासासाठी लेखापरीक्षण अचूक असणे आवश्यक आहे. हे लेखापरीक्षण नेहमी बाहेरच्या ऑडिटर्सकडून केले जाते. बँकांच्याबाबत तर चार चार लेखापरीक्षक नेमलेले असतात ते एवढ्यासाठीच लेखापरीक्षण अचूक असेल तर संबंधित व्यवसाय उद्योग आणि अर्थव्यवस्था यावरील जनतेचा विश्वास जास्त द़ृढ होतो. म्हणूनच लेखापरीक्षण हे पारदर्शक, नि:पक्षपाती आणि योग्य असणे अत्यंत जरुरीचे आहे. लेखापरीक्षण त्रयस्थांकडून केले जात असल्यामुळे जगात सर्वजण त्याला महत्त्व देतात. (stock market)

आंतरराष्ट्रीय बाजारात समभागांचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे निर्देशाकांत व निफ्टीत तात्पुरती घसरण दिसते. गेल्या आठवड्यात निर्देशांक सुमारे 1200 अंकांनी घसरण होता. मॉर्गन स्टॅन्ले या अमेरिकन पतमूल्यन संस्थेने भारतीय समभागांचे पतमानांकन खाली आणले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून नफा गाठीला बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री केली गेली.

गेल्या आठवड्यात त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचे समभाग विकले. कोरोनाच्या साथीमुळे या काळात कंपन्यांच्या उलाढालीत घट झाली. म्यानमारमध्ये अदानी समूहाने आपली कामे थांबवली. त्यामुळे या कंपनीचे समभाग 7,8 टक्क्यांनी घसरले. निर्देशांक खाली येण्यासाठी वरील कारणे होती. त्यामुळे नजीकच्या काळात गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घ्यावा. हा पवित्रा घेऊनही गुंतवणूक करण्याची नामी संधी आहे हे विसरू नये.

दिवाळीच्या मुहूर्तावर जे शेअर्स निवेशनीय आहेत त्यांची माहिती खाली दिली आहे. इंडियन बँक ही एक राष्ट्रीयीकृत मोठी बँक असून 1907 साली जेव्हा स्वदेशीचा नारा सुरू झाला तेव्हा तिची स्थापना केली गेली. म्हणजेच ही बँक आता 114 वर्षांची झाली आहे. आगामी वर्षात तिच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ सहज व्हावी. ती बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा पुरवते.

एसबीआय कार्डचा सध्याचा भाव 1080 रुपये आहे. सध्या काहीही खरेदी करण्यासाठी कार्डाचा उपयोग केला जातो. त्यामुळे या बँकेचे कार्डधारक सतत वाढणार आहेत. हा शेअरही पुढील दिवाळीपर्यंत 30 टक्के वाढू शकतो. (stock market)

सीडीएसएल (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस) या शेअरचा भाव सध्याचा भाव 1325 रुपयांच्या आसपास आहे. शेअरबाजार सध्या जोरात असल्यामुळे अनेक कंपन्या नोंदीत होण्यासाठी पुढे येत आहेत. या कंपन्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच राहील.

प्राज इंडस्ट्रीज ही पुण्यातील एक नामांकित इथेनॉलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. सध्या पेट्रोल व डिझेलचे भाव भडकत असल्यामुळे त्यात इथेनॉल घालण्याचे प्रमाण वाढत आहे. ब्राझीलसारख्या देशात इथेनॉल मोठ्या प्रमाणात पेट्रोलमध्ये घातले जाते. सध्या या शेअरचा भाव 125 रुपयांच्या आसपास आहे. तो वर्षभरात 35 टक्के तरी वाढावा.

टाटा समूहातील टाटा मोटर्स ही एक मोठी कंपनी आहे. सुमोसारख्या प्रवासी गाड्यांचे ती उत्पादन करते. टाटा मोटर्स डीव्हीआरच्या भागधारकांना वार्षिक व सर्वसाधारण सभातून मतदान करण्याचा अधिकार नाही. या कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव 250 रुपयाच्या आसपास आहे. इथेही पुढच्या दिवाळीपर्यंत 30 टक्क्यांची वाढ व्हावी.

टाटा पॉवर ही विद्युत ऊर्जा उत्पादन करणारी कंपनी आहे. देशभरात तिची अनेक ठिकाणी उत्पादन केंद्रे आहेत. देशात विजेची मागणी सतत मोठ्या प्रमाणावर होत राहणार आहे. त्यामुळे या कंपनीचे भविष्य सदैव उज्ज्वल राहील. या कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव 215 रुपयांच्या आसपास आहे. हाही शेअर वर्षभरात 275 रुपयांपर्यंत जावा.

Back to top button