कन्यादान पॉलिसी च्या अंतरंगात… | पुढारी

कन्यादान पॉलिसी च्या अंतरंगात...

राकेश माने

कन्यादान हे प्रत्येक पालकांच्या आयुष्यातील मोठा क्षण असतोे. आपल्या मुलीचा विवाह धुमडाक्यात व्हावा, असे प्रत्येकच आई-वडिलांना वाटते. परंतु विवाहासाठी पैसादेखील खूप लागतो. पूर्वी हजारात होणारे लग्न लाखांच्या घरात पोहोचले आहे. दागदागिने, आहेर, मानपान, पाहुण्यांची सरबराई आदींसाठी खूप पैसा लागतो. आपणही मुलीच्या लग्नावरून चिंतेत असाल आणि तिच्यासाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल, तर एलआयसीची ‘कन्यादान पॉलिसी’ ही अतिशय उपयुक्त आहे.

आपण दररोज 130 रुपये जरी वाचवले तर मुलीच्या लग्नासाठी आपल्याकडे 27 लाख रुपये जमा होतील. यापेक्षा अधिक पैसे जमा करू इच्छित असाल, तर गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. त्याचवेळी आपल्याला प्राप्तिकर कायद्याच्या दीड लाखांपर्यंतच्या करसवलतीचा फायदादेखील मिळतो. त्यामुळे आपण दररोज 130 रुपये बाजूला काढून ठेवा. ही रक्कम तिच्या विवाहापर्यंत म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत तब्बल 27 लाख रुपये होईल. एवढ्या रक्कमेत आपण सहजपणे कन्यादान करू शकता.

कन्यादान पॉलिसी काय सांगते

भारतीय संस्कृतीत कन्यादानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा एखादा पिता मुलीचे लग्न लावतो, तेव्हा तो कन्यादानाची प्रथा पूर्ण करतो. कन्यादानाचे महत्त्व ओळखूनच एलआयसीने या पॉलिसीला कन्यादान असे नाव दिले. या आधारावर मुलीचे लग्न पालक सहजपणे पार पाडू शकेल. यासंदर्भात पॉलिसी बाजार डॉट काम म्हणते की, ही एक अशी निश्चित योजना नाही. परंतु जीवन लक्ष्य पॉलिसीचा हा एक कस्टमाइज प्लॅन आहे. एलआयसीच्या संकेतस्थळावर कन्यादान पॉलिसी नावाने कोणताच प्लॅन पाहावयास मिळणार नाही. परंतु कंपनीचे एजंट हे ‘जीवन लक्ष्य पॉलिसी’ला मुलीच्या विवाहाचे रूप देऊन त्याला कस्टमाइज करतात आणि कन्यादान पॉलिसी नावाने या प्लॅनची विक्री करतात.

त्याचे लाभ काय

वास्तविक, एलआयसीची कन्यादान पॉलिसीही 25 वर्षांची आहे. परंतु या कालावधीत शेवटच्या तीन वर्षांत कोणताही हप्ता भरण्याची गरज नाही. एखाद्या घटनेत पालकाचा किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर एकरकमी दहा लाख रुपये मिळतात. तसेच हप्ता भरण्यावरही सवलत मिळते. मृत्यू सामान्य कारणामुळे झाला असेल, तर एकरकमी पाच लाख रुपये मिळतात आणि पुन्हा दरवर्षी 50 हजारांचा हप्ताही भरला जातो. त्याचबरोबर मॅच्युरिटीनंतर संपूर्ण पैसा परत दिला जातो.

पॉलिसी कोण घेऊ शकतो

एलआयसीची कन्यादान पॉलिसी ही केवळ वडीलच घेऊ शकतात. यासाठी वय 18 पेक्षा अधिक आणि 50 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. त्याचवेळी मुलीचे वय किमान 1 वर्ष असणे अपेक्षित आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी आपल्याला एलआयसीच्या एजंटशी चर्चा करावी लागेल. या आधारावर जीवन लक्ष्य पॉलिसीला कस्टमाईज करून कन्यादान पॉलिसी उपलब्ध करून देईल. पॉलिसीला घेताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मुलीचे बर्थ सर्टिफिकेट यासारखे महत्त्वाचे कागदपत्रे दाखवणे गरजेचे आहे.

Back to top button