वेळेवर आहाराचे महत्त्व | पुढारी

वेळेवर आहाराचे महत्त्व

बदलत्या जीवनशैलीमुळे राहणीमान, खानपान यात आमुलाग्र बदल झाले आहेत. जेवण्याची वेळ निश्चित राहिली नाही. सकस आहाराऐवजी वेळेअभावी अचरबचर खाणे, घाई गडबडीत खाणे किंवा आहार टाळणे यासारख्या गोष्टी घडत आहेत. रात्री उशिरापर्यंत जागरण, तासन्तास काम करणे, उशिराने भोजन करणे हे आपल्या आयुष्याचे घटक बनले आहे. जर आपण आहार वेळेत घेतला नाही तर त्याचे नुकसान अधिक आहे.

एका संशोधनानुसार, रात्री उशिरा जेवल्याने हदयाशी निगडित आजार बळावण्याची शक्यता असते. उशिरा जेवल्याने शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक बिघडतो आणि त्यामुळे शरीरात ब्लड फॅटचे प्रमाण वाढते. या आधारावर कमी वयात हृदयविकाराची शक्यता वाढते. ज्यांना रात्री जेवण्याची सवय आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कायम राहतो. कारण दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी शरीर कमी सक्रिय राहते आणि रात्री आहाराचे पचन करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयावर ताण पडतो.
रात्री उशिरा जेवल्याने अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने हदयाशी जोडला जातो.

रात्री उशिरा जेवल्याने केवळ झोपेतच अडथळे येत नाही तर शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडते. त्यामुळे दोन प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सामोर जावे लागेल. एक म्हणजे वजन वाढणे आणि निद्रानाश या सारख्या आजाराचा सामना करणे. वजन वाढल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. या आधारावर हृदय कमकुवत बनते आणि हृदयविकार बळावण्याची शक्यता असते. झोप पूर्ण न झाल्याने अशा प्रकारच्या अडचणींला सामोरे जावे लागते.

उशिरा भोजन केल्याने मधुमेहात वाढ, हृदयरोग, लठ्ठपणा, अ‍ॅसिडीटी यासारख्या गोष्टी उद्भवतात. आपण जेवढे उशिरा आहार कराल, तेवढ्या प्रमाणात शरीर उशिरा झोपण्यास तयार होईल. यामुळे स्मरणशक्ती आणि दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण बळावू शकते. भोजन वेळेवर न केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. रात्री उशिरा जेवल्याने इन्सुलिन, ग्लुकोज, कॉलेस्ट्रॉल वाढत जाते.

जोखीम कमी करण्यासाठी सकाळी भरपेट न्याहरी करणे गरजेचे आहे. दुपारचे जेवण कधीही सोडू नये आणि रात्री जेवण हलके असावे आणि ते सातच्या आत करावे. काही तज्ज्ञांच्या मते, आपण झोपेत असताना शरीरात अंतर्गत डागडुजी आणि सफाई होत असते. जर झोप पूर्ण झाली नाही तर विषाक्त पदार्थ साफ होत नाहीत. त्यामुळे रक्तदाबाची जोखीम वाढते. रक्तदाब हा थेटपणे हृदयाशी निगडित आजारांना निमंत्रण देते.

डॉ. भारत लुणावत

Back to top button