Friendship Day निखळ मैत्रीला जेव्हा प्रेमाचं लेबल लागतं…! | पुढारी

Friendship Day निखळ मैत्रीला जेव्हा प्रेमाचं लेबल लागतं...!

Friendship Day जग हे स्थित्यंतरावर चालतं अस म्हटलं जातं. जगाची वाटचाल ही नेहमी वेळेबरोबर सुरू असते. मग मानवाची जीवनशैली, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा, वैचारिक समृद्धता या सगळ्या गोष्टी काळानुरूप बदलत असतात. पण हे सर्व एकीकडे असताना दुसरीकडे मात्र अशी एक गोष्ट- विचार आहे की जो आजही समाजात, माणसांच्या मनामनात ठासून भरलेला आहे. त्यात अमूलाग्र म्हणावा असा बदल झालेला नाही. तो विचार म्हणजे ‘ एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते’. (Friendship Day special artical)

मुलगा आणि मुलगीच्या निखळ मैत्रीच्या नात्याला आजही त्याच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. समाज कितीही प्रगत झाला अस आपण म्हटलं तरी हा विचार मात्र आजही लोकांच्या डोक्यात शाबूत आहे. मात्र एक मुलगा आणि एक मुलगी हे खरंच चांगले मित्र असू शकत नाहीत का ?

Friendship Day : पवित्र मैत्रीच्या नात्यास नेहमीच जगाच्या नजरेत खालचा दर्जा मिळतो

समाजात फार पूर्वी पासूनच मैत्रीची संकल्पना एका विशिष्ट चौकटीत मांडली जाते. मैत्री ही केवळ मुलगा-मुलगा किंवा मुलगी-मुलगी यांच्यामध्येच होऊ शकते हाच विचार समाजात रूढ झाला आहे. म्हणूनच पुर्वीची अशी मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्रीची उदाहरणे पाहिली की त्यावेळी इतरांसाठी ते नवलच वाटायचे. आज जितके स्वातंत्र्य आहे तितकं स्वातंत्र्य पूर्वी कोणाच्याच वाट्याला येत नसायचे.

पण त्यातही निव्वळ मैत्रीने जोडलेली भिन्नलिंगी लोक आयुष्यात सर्वात सुखी असावी असं वाटत. हल्ली सुद्धा बरेच तरुण तरुणी आपणास एकत्र पाहायला मिळतात.

पण याचा अर्थ त्यांच्यामध्ये मैत्री नसून बरच काही वेगळं चाललेलं आहे अशी बऱ्याच जणांची धारणा असते.

इतक्या निखळ आणि पवित्र मैत्रीच्या नात्यास नेहमीच जगाच्या नजरेत खालचा दर्जा मिळत असतो.

निखळ आणि निर्मळ मैत्रीचं नातं प्रत्येकाच्या वाट्याला येत नसत

नात्यांना लेबल लावायची जगाला खूप मोठी हौस असते. मग समजा पुढून एखादे भाऊ बहीण जरी हातात हात घालून चालत असले तरी त्यांना जोडपं म्हणून लेबल लावण्यात आपण कमी पडत नाही. मग मैत्रीचं तर मग बोलायला नको. आयुष्यात एक तरी चांगली मैत्रीण असावी..एक तरी चांगला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटत असत. पण निखळ आणि निर्मळ मैत्रीचं नातं प्रत्येकाच्या वाट्याला येत नसत. आयुष्यात बऱ्याच नात्यांची वीण आपसूक बांधली जाते पण मैत्रीचं नात जोडण्यास आणि टिकविण्यास खरंच आयुष्य पणाला लावावं लागत.

प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, आनंद, दुःख, चढ उतार हे नेहमी कोणाशी तरी शेअर करावे. यातील काही गोष्टी या आपण आपल्या मित्रांशी शेअर करू शकतो पण काही गोष्टी समजून घेण्यात आपले मित्र कमी पडू शकतात. अशावेळी आपली एखादी चांगली मैत्रीण असेल तर ती आपली अनेक बाबतीत मदत करू शकते, अडचणीत सल्ला देऊ शकते. पण कित्येकदा अशी मैत्री ही समाजाच्या भीतीने समाजाच्या नजरेआड न येता निभावावी लागते. मैत्रीचे नाते कितीही पवित्र असले तरी केवळ ‘लोग क्या कहेंगे’ या उक्तीप्रमाणे ही मैत्री अदृश्यच राहते.

पण जेव्हा मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्री निर्माण होते

पण जेव्हा अशी मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्री निर्माण होते तेव्हा अशा मैत्रीत एक मर्यादा असते, सीमारेषा असते. ज्यांना ही सीमारेषा ओळखून येते ती मैत्री मैत्रीच्या नात्यातून वेगळ्या नात्याकडे कधीच वळत नाही. दोन्ही बाजुंनी या गोष्टीचे भान राखणे आवश्यक असते. जर समोरच्याला आपल्याशी निव्वळ मैत्री निभावायची असेल तर आपणही त्या निर्णयाचा आदर करायला हवा. अन्यथा मग समाज ज्या नजरेने, ज्या विचाराने आपल्या मैत्रीकडे पाहत असतो त्यावर शिक्कामोर्तब होण्यास वेळ लागत नाही.

मैत्रीच नातं समजण्यात गल्लत झाली कि मग आपण एकतर्फी प्रेमाच्या नादात एक छान मैत्रीणही गमावतो. मग हे व्हायचं नसेल आणि आपल्यात फक्त निव्वळ मैत्री टिकवून ठेवायची असेल तर पुढील गोष्टी दोघांनीही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

– मैत्रीमध्ये कधीच आपल्या प्रेमाच्या फीलिंग्स आणण्याचा प्रयत्न करू नका

– निखळ मैत्रीला कधीच प्रेमाचे लेबल लावू नका

– मैत्रीतील मर्यादा ओळखून मैत्रीतील वर्तन असायला हवे

– जर कोणी ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत असेल तर दुसऱ्याने त्यास योग्य शब्दात त्याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी

– स्वतःच्या मैत्रीबद्दल इतरांना काहीतरी वेगळेच सांगून स्वतःच समाजाच्या विचारांना पाठबळ मिळेल असं वर्तन करू नये

– मैत्रीत घडणाऱ्या सर्व गोष्टीबद्दल एकमेकांशी चर्चा करावी आणि त्यानंतरच एखाद्या निर्णयाअंती यावे

हे ही पाहा : 

Back to top button