बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
पंचमसाली लिंगायत समाजाला 2 ए आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 15 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर हिवाळी अधिवेशन काळात सुवर्णसौधला घेराव घालण्याचा निर्णय कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी जाहीर केला. गांधी भवन येथे रविवारी (दि. 22) पंचमसाली वकिलांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. जयमृत्युंजय स्वामी यांनी, आमदार व स्वामीजींच्या शब्दाला सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी किंमत दिली नाही. आता वकिलांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला जात आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच कायदेतज्ज्ञांची बैठक घ्यावी. बैठकीची तारीख व वेळ निश्चित न केल्यास आम्ही राज्यस्तरीय वकिलांची परिषद भरवू. आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे सांगितले.
विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी, विनय कुलकर्णी यांच्यावर समाजातील लोकांचा खूप विश्वास आहे. तो त्यांनी अबाधित राखावा. आधी समाजासाठी काम करू आणि कोणी काही करतो का ते बघू. त्यांना दिल्लीतून मेसेजही येतात. पण माझ्याविरुद्ध कोणीही काही करू शकले नाही. 15 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय जाहीर केल्यास हिवाळी अधिवेशनात बेळगावात सुवर्णसौधला घेराव घालू, असा इशारा दिला. आमदार सी. सी. पाटील यांना आज पंचमसाली वकील मेळाव्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांनी स्वार्थापोटी सहभाग घेतला नाही. इथे समाजापेक्षा पक्षाला महत्त्व दिले आहे. आम्ही कोणत्याही लढाईसाठी तयार आहोत, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचमसाली समाजातील सदस्य सहभागी झाले होते.
सभागृहात स्वामी आक्रमक होत असतानाच मंत्री विनय कुलकर्णी यांनी व्यासपीठाकडे जात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना फोन जोडून दिला. स्वामींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना 15 ऑक्टोबरला बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान, तेथे जमलेल्या वकिलांनी विनय कुलकर्णी यांना ठोस निर्णय घेण्याची विनंती केली.