कर्नाटक : राज्यात चार दिवस राहणार उष्णतेची लाट ; चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

कर्नाटक : राज्यात चार दिवस राहणार उष्णतेची लाट ; चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा
उष्णतेच्या लाटांमुळे ग्रीष्माची दाहकता कमी होण्याचे नाव घेत नाही. संपूर्ण कर्नाटक प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाला असताना हवामान विभागाने आणखी तापदायक बातमी दिली आहे. कर्नाटक, महाराष्ट्रातील विदर्भासह काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने शनिवारी दिला. विदर्भातील सात जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात रविवारी सकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश व ओडिशा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाजवळ कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती शुक्रवारी झाली. शनिवारी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. आता रविवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश व ओडिशाच्या किनारपट्ट्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. हे वादळ सध्या पोर्ट ब्लेअरपासून 300 कि.मी., आंध्रप्रदेशपासून 1,270 कि.मी., तर ओडिशा किनारपट्टीपासून 1,300 कि.मी. अंतरावर घोंघावत आहे. अवघ्या 48 तासांत ते आंध्रप्रदेश व ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे या भागात 115 ते 204 मि.मी. पावसाचा अंदाज आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

…असा वाढणार वार्‍यांचा वेग

चक्रीवादळामुळे वार्‍यांचा वेग 8 मे रोजी ताशी 60 ते 70 कि.मी., 9 मे रोजी 75 ते 85 कि.मी., 10 मे रोजी 85 ते 90, तर 11 मे रोजी ताशी 95 कि.मी. वेगाने राहणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अतिवृष्टीसह मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावधानतेचा इशारा दिला आहे. दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहील.

Back to top button