India Postbox: भारतातील पोस्टबॉक्स लाल रंगाची का आहेत?

पुढारी वृत्तसेवा

पत्रपेटी दिसायला अत्यंत साधी आणि सर्वांचे एकच काम करणारी असली, तरी वेगवेगळ्या देशांमध्ये तिचा रंग वेगवेगळा असतो.

जगातील विविध देशांमधील पोस्टबॉक्सच्या रंगांमागे केवळ आवड-निवड नसून, त्यामागे मोठा इतिहास, युद्ध आणि सुरक्षेशी संबंधित रंजक कारणे दडलेली आहेत.

भारतातील ऐतिहासिक आणि सर्वपरिचित झालेला ‘लाल’ रंगाचा पोस्टबॉक्स हा खरं तर ब्रिटिश काळातील वारसा आहे.

१९व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात पहिल्यांदा पत्रपेट्या सुरू केल्या, तेव्हा त्यांचा रंग हिरवा होता. मात्र, भारतातील झाडीझुडपांमध्ये हा हिरवा रंग अगदी मिसळून जात असे. त्यामुळे अनेकदा लोकांना पत्रपेटी नेमकी कुठे आहे, हे समजत नसे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटनने १८७४ मध्ये आपल्या सर्व पत्रपेट्यांचा रंग बदलून लाल केला. ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारतानेही लाल रंग स्वीकारला.

भारतात सर्वसाधारण पत्रांसाठी लाल रंगाच्या पत्रपेट्या वापरल्या जातात. तर स्थानिक पत्रांसाठी हिरव्या आणि मेट्रो शहरांमधील वेगवान वितरणासाठी निळ्या रंगाच्या पत्रपेट्यांचा वापर केला जातो.

तंत्रज्ञानाच्या युगात आता पत्रपेट्यांचे चित्र हळूहळू दुर्मिळ होत चालले आहे.