Roti Vastu tips: या तिथींना घरात भाकरी/चपाती बनवू नका, अन्नपूर्णा देवी होते नाराज!

पुढारी वृत्तसेवा

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशेष तिथी आणि सणांना घरात भाकरी/चपाती बनवणे वर्जित मानले जाते. यामुळे सुख-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या या तिथी...

Vastu Shastra tips | file photo

१. शीतला अष्टमी

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला 'शीतला अष्टमी' साजरी केली जाते. या दिवशी घरात ताजे अन्न शिजवले जात नाही. त्याऐवजी, आदल्या दिवशी बनवलेले अन्न माता शीतला यांना अर्पण केले जाते आणि 'प्रसाद' म्हणून ग्रहण केले जाते.

२. नागपंचमी

नागपंचमीला लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर पूर्णपणे वर्जित असतो. तवा हा नागाच्या फणाचे प्रतीक मानला जातो, म्हणून या दिवशी तव्यावर भाकरी करत नाहीत. या दिवशी प्रामुख्याने पुरी किंवा हलवा बनवतात.

३. शरद पौर्णिमा

अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेलाही घरात भाकरी बनवणे अशुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी खीर-पुरी किंवा सात्विक पक्वान्न बनवण्याची परंपरा आहे.

४. दीपावली

सुख-समृद्धीचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या रात्री स्वयंपाकघरात भाकरी/चपाती बनवली जात नाही. या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी विशेष पक्वान्ने, पुरी आणि मिठाई बनवली जाते.

Diwali Broom Worship

५. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास, त्या दिवशी घरात चूल पेटवली जात नाही आणि भाकरी/चपाती केल्या जात नाहीत. अंत्यसंस्कारांनंतर शेजारी किंवा नातेवाईकांच्या घरून अन्न आणले जाते.

काय आहे यामागचे कारण?

हिंदू धर्मग्रंथांनुसार, तवा हे 'राहू'चे प्रतीक मानले जाते. विशिष्ट शुभ प्रसंगी किंवा देवी लक्ष्मीच्या आगमनाशी संबंधित दिवसांत, तव्यावर थेट पोळ्या करण्याऐवजी गोड पदार्थ बनवणे अत्यंत शुभ मानले जाते; कारण हे पदार्थ समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहेत.