पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा सुरू होताच आंब्यांचा हंगाम रंगात येतो. बाजारात आंबे दिसताच तोंडाला पाणी सुटते.
चवदार असण्याबरोबरच आंब्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.
आपण ऐकत आलो आहोत की आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. हा जुन्या काळातील समज वाटत असला तरी यामागे आरोग्याशी संबंधित कारण आहे.
ऋषिकेश येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राजकुमार यांच्या मते, आंबा शरीरातील उष्णता वाढवतो. आंबा खाल्ल्यानंतर पचनक्रिया अधिक सक्रिय होते.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिल्यास पोटातील तापमान अचानक कमी होते. त्यामुळे पचनक्रिया मंदावू शकते आणि शरीराला आंबा व्यवस्थित पचवणे कठीण जाते.
पचन बिघडल्यास गॅस, अॅसिडिटी, पोटात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच तज्ज्ञ आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला देतात.
आंबा खाल्ल्यानंतर किमान २०–३० मिनिटांनीच पाणी प्या. तसेच खूप थंड पाण्याऐवजी सामान्य तापमानाचे किंवा कोमट पाणी पिणे अधिक योग्य ठरते.
आंबा खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि काही नैसर्गिक घटकांमुळे होणारी अॅलर्जी किंवा अस्वस्थता टाळता येते.